नाशिक | Nashik
नाशिक शहराला (Nashik City) प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री (Manisha Khatri) यांनी आज ‘नो व्हेईकल डे’च्या निमित्ताने एक आदर्श निर्माण केला. त्र्यंबक रोडवर असलेल्या जिल्हाधिकारी निवासस्थानापासून मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन कार्यालयापर्यंत पायी प्रवास करत त्यांनी नाशिककरांसमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवले.
यावेळी ‘नो व्हेईकल डे’ (No Vehicle Day) साजरा करून दोन्ही अधिकारी वर्गाने नागरिकांना पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. गाड्यांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी असे उपक्रम पर्यावरणपूरकसह आरोग्यासाठीही लाभदायक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.पायी चालणे किंवा सायकलचा वापर यामुळे केवळ प्रदूषणच कमी होत नाही, तर आरोग्यही सुधारते. त्यामुळे नाशिक शहरात ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमाला यापुढे जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याचे आवाहन नागरिकांना महानगरपालिका (Municipal Corporation) आयुक्त मनिषा खत्री यांनी केले.
दरम्यान, आज मनपा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.अनेकांनी आज आपल्या दैनंदिन कामांसाठी पायी चालणे (Walk on Foot) पसंद केले. शासन-प्रशासनाच्या या पुढाकारामुळे नाशिककरांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात अशा उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही यावेळी मनपा आयुक्त खत्री यांनी व्यक्त केला.