नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहर व जिल्ह्यातील तृतीयपंथीय समुदायाचे (Transgender Community) ‘गटतट निर्माण झाले असून ‘वसूली’ सह वर्चस्व वादातून त्यांच्यातील संघर्ष पेटत चालला आहे. एकमेकांना मारहाण, प्राबल्य दाखविण्यासह गुरुची ‘आज्ञा’ पाळण्यातून किन्नर समुदाय एकमेकांविरोधात थेट पोलीस ठाण्यांत पोहोचला आहे. त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले असून आता आडगाव पोलीस ठाण्यात (Aadgaon Police Station) संशयित शुभांगी रमेश शिंदे उर्फ सागर शिंदे आणि सोनू घुगे या तृतीयपंथीयांविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आडगाव पोलिसांच्या माहितीसह दाखल फिर्यादीनुसार, ८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री एकच्या सुमारास नांदूर नाका येथील मांगीर बाबा चौकात ही घटना घडली.
फिर्यादीअनिकेत ऊर्फ डॉली वसंत म्हस्के (वय २१, भालेराव मळा, नाशिकरोड) या तृतीयपंथीयाने दिलेल्या तक्रारीवरून (दि. ३) संशयित शुभांगी रमेश शिंदे उर्फ सागर शिंदे आणि सोनू घुगे (दोन्ही रा. नांदूरनाका) या किन्नरांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादीनुसार, संशयितांनी “तू आम्हाला पैसे देणे बंद केलेस, तुला व्यवसाय करू देणार नाही,” असे म्हणत शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर खाली पाडून हाताने-लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडुक्याने मारहाण केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी (Aadgaon Police) दोन्ही संशयितांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले आहे. तपासात गरज भासल्यास अटक करण्याची प्रक्रिया राबविली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दहा तक्रारी
नाशिक शहर व जिल्ह्यात किन्नर समुदायात दीड हजारांहून अधिक तृतीयपंथी असून नाशिक शहरासह सिन्नरला (Sinnar) ही संख्या दीडशेच्या आसपास आहे. दरम्यान, शिंदे टोलनाका व सिन्नर येथे वसूली कोणी करायची, पैशांचे कलेक्शन झाल्यावर हिस्सा कोण व किती देणार यासह हुकुमाखाली राहण्यातून हे वाद उफाळून येत असल्याचा आरोप दोन्ही गटांनी परस्परविरोधात केला आहे. त्यासंदर्भाने आडगा भद्रकाली, नाशिकरोड, सिन्नर व उपनगर पोलिसांत दहापेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या असून हा संवेदनशील विषय पोलीस सावधतेने हाताळत आहेत. तर दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु असून हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.
सलमा गुरुवरही आक्षेप!
तृतीयपंथीयांची एक गुरु सलमा गुरु उर्फ सलीम हिने तृतीयपंथीयांवर अन्याय व अत्याचार केला असून तिच्या एककलमी कार्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा शुभांगी शिंदे हिने केला आहे. दोन्ही गटांतील तृतीयपंथीयांनी एकमेकांच्या जीवितास धोका असून गुरु कोणाला मानायचे, आज्ञा कुणाची पाळायची, पैसे कुणाला व किती द्यायचे, हा संघर्ष अधिकच इरेला पेटत चालला आहे. हा संघर्ष नेमका कसा शमणार याकडेच अनेकांचे लक्ष आहे. सिन्नर, भद्रकाली, आडगाव व नाशिकरोड पोलिस (Nashik Road Police) तपास करत आहेत.





