नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात गत वर्षभरात जिल्ह्यात २ कोटी ५१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या १७६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर ७४ लाख, ८२ हजार, ३०८ रुपयांचा दंड (Fine) वसूल करणे बाकी आहे.
जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात (Taluka) गत वर्षभरात अवैध वाळू, दगड, माती आणि मुरुम उत्खनन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या उत्खननामुळे पर्यावरणाचा (Environment) ऱ्हास तर होतोच, दुसरीकडे गौणखनिज चोरीमुळे शासनाचा महसूलही बुडत आहे. परिणामी जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अवैध उत्खननाविरोधात नाशिक, निफाड, इगतपुरी, देवळ्यात सर्वाधिक कारवाई (Action) करण्यात आल्या आहेत.
७५ लाख रुपयांचा दंड वसुली बाकी
मागील वर्षभराचा आढावा घेतला असता जिल्हा प्रशासनाने २ कोटी, ५१ लाख, २१ हजार, ८५२ रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यातील १ कोटी, ७६ लाख, ३९ हजार, ५४४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर ७४ लाख, ८२ हजार, ३०८ रुपयांचा दंड वसूल करणे बाकी आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांकडून तब्बल ४० वाहने जप्त करण्यात आली असून ५ प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नाशिक, निफाड, इगतपुरी, देवळा या ४ तालुक्यांतून अवैध उत्खनन होत असल्याच्या तक्रारीनुसार प्रशासनाकडून कारवाई सुरु करण्यात आली. कारवाईत नाशिकमध्ये ४६ लाख, निफाडमधून ३६ लाख, इगतपुरीत ३२ लाख तर देवळ्यातून १६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गौण खनिजाचे उत्खनन करतांना शासनाला रॉयल्टी भरणे अत्यावश्यक आहे. रॉयल्टी न भरता अवैध उत्खनन करणे कारवाईस पात्र आहे. जिल्ह्यात अवैध उत्खनन करणाऱ्यांविरोधात शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येते. शासनाच्या नियमाप्रमाणेच गौण खनिजाचे उत्खनन करता येईल. अवैध माफियांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.
आबासाहेब तांबे, जिल्हा खनिकर्म अधिकारी, नाशिक जिल्हा