नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा (Water Supply) करण्यासाठी नाशिक महापालिका (Nashik NMC) जलसंपदा विभागाकडून पाणी आरक्षित करून त्या बदल्यात वर्षाला सुमारे २४ कोटी रुपये पाणीपट्टी अदा करते. मात्र, जलसंपदा विभागाने यंदा नाशिक महापालिकेला पत्र देऊन त्यात दहा टक्के वाढ केली आहे. त्यामुळे महापालिकेवर वर्षाला सुमारे दोन कोटी चाळीस लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे महापालिका देखील आपल्या पाणीपट्टीत दहा टक्के वाढ करु शकते.
मागील तीन वर्षांपासून महापालिका पाणीपुरवठा विभाग जलसंपदाला वर्षाला २४ कोटी रुपये मोजत असून, आता दरवाढीमुळे २६ कोटी ५० लाख रुपये मोजावे लागणार आहेत. गंगापूर धरणातून उपलब्ध जलसाठ्यानुसार वर्षाला महापालिकेसाठी पाणी आरक्षित ठेवले जाते. पाणीपुरवठा विभाग (Water Supply Department) दिवसाला २४५ एमएलडी पाणी उचलतो. महापालिका गंगापूर धरणातील पाणी उचलपोटी जलसंपदा विभागाला दरवर्षी पाणीपट्टी अदा करते. महापालिका व जलसंपदा यांच्यात २०२२ ते २०२८ या कालावधीसाठी पाणीवापराबाबत करार झालेला असून, पहिल्या तीन वर्षासाठी दहा हजार लीटरसाठी ६.५० पैसे दर आकारला जातो.
त्यानुसार महापालिकेने वर्षाला २४ कोटी पाणीपट्टी जलसंपदाला अदा केली. करारात तीन वर्षानंतर दहा टक्के वाढीचा समावेश होता. त्यामुळे आता २०२५ ते २०२८ या तीन वर्षासाठी दहा टक्के दरवाढीनुसार ६ रुपये ६६ पैसे आकारले जातील. म्हणजे वर्षाला अडीच कोटी जादा मोजावे लागणार आहेत. येत्या जून महिन्यापासून ही दरवाढ लागू होणार आहे. एकीकडे महापालिका जलसंपदा विभागाला (Water Resources Department) दरवर्षी कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी अदा करत असली तरी दुसरीकडे शहरवासीयांनी जवळपास महापालिकेची २५० कोटींची पाणीपट्टी थकवली आहे.
स्पॉट बिलिंगचा फायदा होणार
नाशिक महापालिकेच्या पाणीपट्टी महसुलात वाढ व्हावी, तसेच मनपाकडून वितरित केल्या जाणाऱ्या पाण्याचा हिशेब लागावा, या उद्देशाने बिले वाटप करण्याबरोबरच नळ कनेक्शनचे सर्वेक्षण कॅनबेरी या खासगी कंपनीकडून सुरू करण्यात आले आहे. त्याचा फायदा मनपाला होणार आहे. या माध्यमातून वॉटर मीटरचे रीडिंग घेऊन अॅप्लिकेशनद्वारे संबंधित नळ कनेक्शनधारकास स्पॉट बिलिंग देण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून पाणीपट्टी बिलांचे तिमाही वाटप केले जात आहे.
४० टक्के पाण्याचा हिशेब लागेना
शहरातील ४० टक्के पाण्याचा हिशेब लागत नाही. त्यासाठी मनपा प्रयत्न करीत आहे. मात्र, आता कंपनीकडून वॉटर मीटरसंदर्भातील सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. महापालिकेचे शहरात सुमारे दोन लाख १२ हजार नळ कनेक्शन आहेत. मोठ्या प्रमाणावर पाणीगळती, तसेच पाणी चोरी होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मनपाकडून पावले उचलली आहे.