लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon
येथील बाजार समितीत (Market Committee) दोन आठवड्यात उन्हाळ कांदा तब्बल ५०१ रुपये कमाल तर १५० रुपये सरासरी प्रति क्विंटल दराने घसरला आहे. गेल्या सोमवारच्या तुलनेत ३९९ रुपये किमान दराने काल कांदा भाव कोसळले. दोन आठवड्यांपूर्वी दि.२१ जुलै रोजी २,१०० रुपये क्विंटल कमाल दराने विक्री झालेला कांदा काल (दि.४) सप्ताहाच्या पहिल्या दिवशी १,५९९ रुपये भावाने विक्री झाला.
उन्हाळ कांदा (Summer Onion) काढणी सुरू झाल्यानंतर मे महिन्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सततच्या पावसामुळे काढणी केलेला कांदा भिजल्यामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला. दोन पैसे पदरात पडतील या अपेक्षेने कांदा उमत्पादकांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता सडू लागला आहे. कांद्याची नासाडी होत असल्याने कांदा विक्री करावा तर अपेक्षित दर नाही. त्यामुळे शेतकरी (Farmer) दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहे.
नाफेडची कांदा खरेदी बंद!
यंदा केंद्र सरकारने (Central Government) नाफेड आणि एनसीसीएफ यांना तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट देऊन तीस जुलै अंतिम मुदत दिली होती. उद्दिष्टापूर्वीच निम्मी कांदा खरेदी झालेली असताना मुदत संपल्याने कांदा खरेदी बंद केली आहे. महाराष्ट्रात ४४ ठिकाणी नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहे. त्या त्यापैकी ३८ केंद्र नाशिक जिल्ह्यात आहेत.




