नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य आणि चित्तथरारक उभ्या पायऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक हरिहर गडावर (Harihar Fort) प्रशासनाने पर्यटकांना पुन्हा एकदा प्रवेशबंदी लागू केली आहे. त्र्यंबक प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने (Trimbak Regional Range Forest Officer) बुधवारी (दि. १९) अधिकृत आदेश जारी केला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर संपत देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात (Rain) गडाच्या खड्या पायऱ्या अत्यंत निसरड्या होतात. दाट धुके, अचानक बदलणारे हवामान आणि जोरदार पावसामुळे अपघाताचा मोठा धोका असतो. तसेच क्षमतापेक्षा जास्त गर्दी होणे, पर्यटक (Tourist) वनक्षेत्रात हरवणे आणि तरुणांकडून होणारी हुल्लडबाजी वा धोकादायक सेल्फीचे प्रकार यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी त्र्यंबक वनपाल, मेटेउभाडे वनरक्षक, संयुक्त वन व्यवस्थापन समिती (हर्षवाडी) आणि कळमुस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंचांना निर्देश दिले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत गड पर्यटनासाठी पूर्णपणे बंद राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. वन विभागाने (Forest Department) सर्व पर्यटकांना हरिहर गडाकडे न जाण्याचे आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.




