नाशिक | Nashik
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मनसेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याची घोषणा करत ‘महागठबंधन’ केल्याची माहिती दिली. यामुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची तयारी सुरू झाल्याची चर्चा असून, नाशिकमध्ये (Nashik) उभारलेले हे महागठबंधन राज्याच्या पातळीवर ‘महायुती’ला थेट आव्हान देणारे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. यानंतर आता काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी नाशिकमध्ये मनसेची कोणतीही युती होणार नसल्याचे ट्वीट केले. त्यामुळे अवघ्या काही तासांतच काँग्रेसचे स्थानिक नेते तोंडघशी पाडल्याचे बघायला मिळत आहे.
हे देखील वाचा : Nashik Politics : महाविकास आघाडीचे ‘महागठबंधन’ ; नाशिकमध्ये मनसेसह सर्वपक्षीय मोट बांधली, आगामी निवडणुका एकत्र लढण्याची केली घोषणा
काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी याबाबत ट्वीट केले असून, त्यांनी नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेने बरोबर जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशा बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या संदर्भात त्यांना तेथे विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी देखील त्याच पद्धतीने सांगितले की, यासंदर्भातील निर्णय प्रदेश काँग्रेस घेत असतो. त्यामुळे या गोष्टीला काहीच अर्थ नाही. काँग्रेस पक्षाने अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासाठी फक्त इंडिया आघाडीच्या सदस्यांसोबत चर्चा करण्यासाठी नेत्यांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे, असेही सावंत यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
दरम्यान, या पत्रकार परिषदेस मनसे सरचिटणीस दिनकर पाटील, माकपा प्रदेश सरचिटणीस तानाजी जायभावे, मनसे उपनेते सलीम शेख, मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, माकपा प्रदेश सचिव राजू देसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) गजानन शेलार, शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष डी.जी. सूर्यवंशी, काँग्रेसचे ज्ञानेश्वर गायकवाड, माकपा राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल.कराड, काँग्रेसचे राहुल दिवे, सिटूचे सीताराम ठोंबरे, मनसेचे अकुंश पवार, माजी आमदार वसंत गिते, गोकुळ पिंगळे, शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश गीते, माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मनसेचे दिनकर पाटील काय म्हणाले होते?
पत्रकार परिषदेमध्ये मनसे (MNS) नेते दिनकर पाटील बोलताना म्हणाले की, लोकशाही जिवंत राहण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.देशात राहुल गांधी यांनी मत चोरीवर सरकार आल्याचे निदर्शनास आणून दिले. मुंबईत एकत्रित मोर्चा झाला. ९६ लाख दुबार मतदार असून,शिंदेंच्या सेनेने देखील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचे सांगितले आहे. जनतेला न्याय मिळाला पाहिजे,ओला दुष्काळ, कर्जमाफी यासाठी आम्ही लढतो आहोत. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने नाशिकमध्ये मोर्चा काढला होता. गुन्हेगारी विरोधात आम्ही मोर्चा काढला. नाशिक गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी आम्ही मोर्चा काढला. आधी दादा भुसे पोलिस आयुक्तांना भेटले, नंतर सगळे आमदार भेटले. आमच्या मोर्चाचा धसका घेतल्याने नाशिक गुन्हेगारी मुक्त झाले आहे, असे त्यांनी म्हटले होते.
राहुल दिवे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवे पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, आम्ही वरिष्ठांच्या सांगण्यानुसारच हा निर्णय जाहीर करत आहोत, असे म्हटले होते. तर काँग्रेसचे सचिन सावंत यांनी “स्थानिक पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा तशा पद्धतीचा अधिकार नाही. त्यांच्या काय भावना आहेत त्या त्यांनी प्रदेश काँग्रेसला कळवायच्या असतात. मग प्रदेश काँग्रेस त्यावर निर्णय घेते,कोणी वैयक्तिक स्वरूपाची भावना व्यक्त करत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. नाशिक काँग्रेसला तसा अधिकार दिलेला नाही”, असेही ते म्हणाले.




