नाशिक | Nashik
माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले शिरीषकुमार कोतवाल (Shirish Kumar Kotwal) नाशिकचे माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी नगरसेविका नंदिनी बोडके, खंडू बोडके, युवा नेते नरेश पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज (गुरुवारी) भारतीय जनता पक्षात (BJP) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. नाशिक येथील वसंत स्मृती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
दरम्यान विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता कोतवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी आमदार राहुल आहेर, आ. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते विजय साने, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, दक्षिण जिल्हाध्यक्ष यतीन कदम, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.
यावेळी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, “शिरीष भाऊ आजपासून तुम्ही भाजपवासी (BJP) झाले आहात. देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात आला असून, यापुढे कुठेही जायचे नाही. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू. भाजपमध्ये काँग्रेससारखी (Congress) भीती नाही आणि स्थिती पण नाही. त्यामुळे याठिकाणी तुम्हाला काम करायला भरपूर वाव आहे. तुम्ही पक्षाकडे जे काम घेऊन याल ते निश्चित होईल, याची खात्री बाळगा. आतापर्यंत तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत काम केले आहे. आठ वेळा आमदारकीची निवडणूक लढवलेली आहे. आता हा तुमचा शेवटचा पक्षप्रवेश असून, याच्यापुढे कुठेही जायचे नाही आणि जाण्याची वेळ येणारही नाही”, असे त्यांनी सांगितले.
तसेच आमदार राहुल आहेर (Rahul Aher) म्हणाले की, “मी तीन निवडणुका शिरीष कोतवाल यांच्यासोबत आमनेसामने लढलो. परंतु, व्यक्तिगत पातळीवर कधीही टीका केली नाही. फक्त तत्वाचे राजकारण केले. गिरीश भाऊंसोबत आता शिरीष भाऊही पक्षाला लाभले आहे. त्यामुळे भाजपचा हा बालेकिल्ला अधिक बळकट झाला आहे”, असे त्यांनी म्हटले.
तर कोतवाल म्हणाले की, “आजपासून आम्ही भाजपवासी झालो आहोत. आम्ही कोणतेही किंतु-पंरतुसाठी पक्षात आलेलो नाही. देशाचा विकास व्हावा हाच हेतू आहे. गेले काही दिवस मी काँग्रेसमध्ये नाराज होतो. त्या नाराजीला खतपाणी मिळत गेले, त्यातून आजचा हा पक्षप्रवेश (Joining) सोहळा होत आहे”, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोतवाल यांच्यासह नरेश पाटील, नीलम पाटील, शिवाजी बस्ते, गौरव आग्रवाल , सागर निकम, भागवत जाधव, एकनाथ पगार, शिवाजी कासव, दिनेश जाधव, गुलाब पवार, बाळासाहेब शिंदे यांच्यासह आजी-माजी सरंपच यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे चांदवड तालुक्यात भाजपचा बालेकिल्ला अधिक बळकट झाला आहे. यावेळी अमित घुगे यांनी सूत्रसंचालन तर उत्तम उगले यांनी आभार मानले.




