सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
सिन्नरच्या (Sinnar) जनतेने माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे. नगरपरिषदेची सत्ता दिल्यास सिन्नर शहराला वेगळ्या उंचीवर नेण्याचे माझे स्वप्न असल्याचे प्रतिपादन ना. माणिकराव कोकाटे यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या (NCP Candidate) प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपिठावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार विठ्ठल उगले, सिमंतीनी कोकाटे, अॅड. राजेंद्र चव्हाणके यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार होते.सिन्नर नगरपरिषदेचा मुख्याधिकारी काम करत नाही म्हणून त्याला बदलून देण्याची किती वेळा मागणी केली. साधा मुख्याधिकारी बदलून देता आला नाही अन् आता थेट सिन्नर दत्तक घ्यायला निघाले, असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव न घेता लगावला.
ते म्हणाले की, विरोधकांकडे विकासाचे कुठलेही व्हिजन नसून केवळ जातीपातीचे राजकारण (Political) करण्यातच त्यांना रस आहे. नगराध्यक्षपदासाठी नामदेव लोंढे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, पुतण्याची नगरसेवकपदाची उमेदवारी मागे न घेतल्याने मला उगले यांना उमेदवारी (Candidate) द्यावी लागली. आता ते शिंदे गटात गेले. मी नेहमी खरं बोलतो. खरे बोलण्यामुळे माझं खात बदललं. मला त्याच काही वाटलं नाही. शिवसेनेत असतांना मी कब्रस्थानसाठी पहिल्यांदा निधी दिला. महात्मा फुले शाळेला न मागता ८० लाख दिले. नागेश्वरीसाठी ४ कोटी दिलेत.कुणीच माझ्याकडे निधी मागायला आले नव्हते तरीही हा निधी मी दिला. नगरपरिषदेला प्रशस्त इमारत दिली.पंचायत समिती, तहसिल कार्यालय, उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारती आधी का झाल्या नाहीत? विमानतळासारखं सिन्नरसारखं बसस्थानक राज्यात कुठेही नाही. आपल्याला शहरात बदल घडवायचा आहे, असे कोकाटे यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, शहरात रस्त्याने नीट चालता येत नाही. उपनगरांमध्ये रस्ते, गटारी नाहीत. कडवा योजनेचे मी स्वतःच नियोजन केले. मी कधीही जाती-पातीचं राजकारण करीत नाही. जायगावचा दिघोळे नावाचा मुलगा कुस्तीत जिंकल्यानंतर त्याला माझ्या खात्याच्यावतीने २५ लाख दिले. पाटोळेची आंधळे नावाची मुलगी नौकानयनमध्ये जिंकल्यानंतर तिलाही सर्व साधन सुविधा मिळतील याची व्यवस्था केली. क्रीडा संकूल, रस्ते, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आजही मनासारखा होत नाही. त्यामुळेच धरण बांधून पाण्याचा प्रश्नच मिटवणार आहे. सोलरच्या माध्यमातून नगरपरिषदेचे वीजबिल कमी करणार आहे. घरपट्टीवरील व्याजमाफीचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. ६४ कि.मी. ची भुयारी पूरचारी पूर्ण केली. त्यातून विहीरी तुडूंब भरल्या आहेत. सिन्नरचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही, असे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी म्हटले.
यांचा डीएनए चेक करावा लागेल
भाजपचे (BJP) आयुष्य फोडाफोडीत चाललं असून त्यांचे जुने कार्यकर्ते घरी बसले आहेत. सिन्नरला त्यांनी ओढून ताणून उमेदवार आणले. त्यांच्याकडे विकासाचा आराखडाच नाही. एका दिवसात त्यांनी हेमंत वाजेंना अध्यक्षपदाचा उमेदवार केले. याच्याआधी माझा भाऊ फोडला. तो काही कामाचा निघाला नाही. आता वाजेंच्या घरातला फोडला. पण तोही काही कामाचा निघणार नाही, असा टोला ना. कोकाटे यांनी लगावला. जाती-जातीत, घराघरात भांडणे लावणाऱ्यांचा डीएनए चेक करावा लागेल, असा टोला त्यांनी लगावला. त्यांचा राजकारणापेक्षा अप्पलपोटेपणा, या कामाचे टेंडर, त्या कामाचे टेंडर याकडे जास्त लक्ष असते. अशा प्रवृत्ती राजकारणात पुढे येणे समाजासाठी वाईट आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपत गेलेल्या उदय सांगळे यांचे नाव न घेता ना. कोकाटे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी सभेत हे पुढच्या निवडणुकीच्या वेळी वेगळ्या पक्षात असतील असे म्हटले होते, आता ते खरे ठरले आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत हेमंत वाजेंना तिकीट मिळाले की हे दुसऱ्या पक्षात जातील. त्यांना फक्त स्वार्थ दिसतो. त्यांच्या नादी लागू नका, असे आवाहन ना. कोकाटे यांनी केले.
येडे का खुळे ?
आता काय तर म्हणे वाजे-कोकाटे एकत्र झालेत अशी अफवा पसरवत आहेत. येडे का खुळे म्हणायचे यांना, असा सवाल ना. कोकाटे यांनी केला. मी राज्याचा एक कॅबिनेट मंत्री आहे. मी दुसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून आणेल का? मला वाजेंबरोबर आघाडीच करायची असती तर ती उघडपणे केली असती. तसा मलाही कोणी मालक नाही आणि त्यांनाही कुणी मालक नाही. मी दादांना सांगितलं असतं तर त्यांनीही ऐकलं असतं. वाजेही त्यांच्या नेत्यांना सांगून करू शकले असते. मात्र, ते त्यांचा पक्ष सांभाळत आहेत. मी माझा पक्ष सांभाळतोय. उगाच लोकांच्या मनात गैरसमज पसरवू नका असा सल्ला त्यांनी दिला. लाडक्या बहिणींचा निर्णय हा तीनही पक्षांच्या सरकारचा सामुदायिक निर्णय होता. राज्यातल्या लाडक्या बहिणींना मानधन मिळतच राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
इंडिया बुल्स एप्रिलमध्ये सुरु होणार?
इंडिया बुल्स प्रकल्प सुरु होण्यासाठी मी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. सभेला येण्यापूर्वीच दिल्लीवरुन मला एक फोन आला की तुमच्या तालुक्यातील इंडिया बुल्स प्रकल्प सुरु होण्यासाठी मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे येत्या एप्रिलपर्यंत इंडिया बुल्सचा धूर निघणार असल्याची माहिती ना. कोकाटे यांनी दिली. इंडिया बुल्स सुरु झाल्यास शहरावर अजून ५-१० हजार लोकसंख्येचा बोजा अधिक वाढणार आहे. त्यात मापारवाडी परिसरात नव्याने एमआयडीसी आल्यास तो परिसरही भरुन जाणार असून सिन्नरला मोठ्या निधीची गरज आहे. तो केवळ सत्ता असणारा पक्षच आणू शकतो, असे कोकाटे म्हणाले.
तुम्ही ५०० घेतले, मी १०० तर घेईनच
आता मी क्रीडा व अल्पसंख्याक खात्याचा मंत्री असून सिन्नरच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही. अल्पसंख्याकांसाठी माझ्या डोक्यात मोठे व्हिजन असून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मुस्लीम बांधवांचे कब्रस्थान, शादीखाना, शाळांच्या विकासासाठी मी नेहमीच तत्पर आहे. क्रीडा खात्याच्या माध्यमातूनही तालुक्यात अनेक कामे करायची आहेत. मुसळगाव शिवारात होणाऱ्या विभागीय क्रिडा संकुलासाठी १०० कोटींच्या निधीची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूरला क्रीडा संकुलासाठी ५०० कोटींचा निधी घेतला. मग मी माझ्या तालुक्यासाठी १०० कोटींचा निधी तर घेऊच शकतो, असे ना. कोकाटे म्हणाले.





