नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) स्थापनेला दोन ऑक्टोबरला विजयादशमी व महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या (NMC Election) तयारीसाठी जगातील सर्वात मोठ्या अशा या स्वयंसेवी संघटनेच्या नियोजनबद्ध व अफाट जनसंपर्काचा लाभ मिळवण्याच्या सुप्त हेतूतून भारतीय जनता पक्षातील इच्छुकांनी ही नामी संधी साधण्याचा बेत आखला आहे.
दरवर्षी विजयादशमीला संघाचे शहरात संचलन होतेच. यंदा मात्र त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याला मिळणाऱ्या असाधारण प्रतिसादामुळे संघाचे गणवेशही आता अपुरे पडत आहेत. एक हजार गणवेश हातोहात विकले गेले आहेत. त्यामुळे नव्याने मागणी करणाऱ्यांना ते कसे उपलब्ध करून द्यायचे, असा प्रश्न स्थानिक धुरिणांना पडला आहे.
संघाची संस्कृतमधील, ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे। वा हिन्दू सुखं वर्धमान महामङ्गले पुण्यभूमे त्वदव। पतत्वेष काया नमस्ते नमस्ते ।।१।। ही प्रार्थना आता आठ भाषांत अनुवादित झाली आहे. समाज माध्यमांवर त्याचा जोरदार प्रचार सुरू आहे. संघाच्या संचलनात डॉक्टर उद्योजक, वकील, व्यापारी समाजातील अन्य प्रतिष्टीत व्यक्तींना मोठ्या संख्येने सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे संघाच्या संचलनात यंदा नव्या चेहऱ्यांची संख्या मोठी असणार आहे. एक नामी संधी म्हणूनच भाजप कार्यकर्ते या संघ कार्याकडे पाहत आहेत.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी (NMC and Zilla Parishad Election) इच्छुक कार्यकर्त्यांचा या माध्यमातून जनसंपर्क हा हेतू राहणार आहे. संघाच्या कामात ‘समरस झाल्याचे दाखवण्यावर संघाच्या संपर्कामुळे उमेदवारी मिळविण्यातही अडचणी येणार नाहीत, असा बऱ्याच जणांचा विश्वास आहे.
जनसंवादातून शिक्का पुसणार?
सहा प्रभागात सहा प्रबुद्ध जनसंवादाचे कार्यक्रम होणार आहेत. त्यात सर्व जातीधर्मातील वरिष्ठांना पाचारण केले जाणार आहे. सद्भावनासभा घेऊन वैचारिक मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दहा हजारांची एक वसाहन याप्रमाणे नियोजन करून दोनशे वस्त्यांमध्ये हिंदू संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे. एका धर्माचा, एखाद्या समाजाचा पगडा असलेली संघटना हा शिक्का पुसण्याचा प्रवास या माध्यमातून केला जाणार आहे. गृहभेटी उपक्रमात भाजपचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहेत.
सर्वांशी वैचारिक संवाद
यंदा दीडशे उत्सव संघ शहरात साजरे करणार आहे. नाशिकची लोकसंख्या सुमारे २२ लाख ३० हजार असून, पाच लाख घरे आहेत. त्या प्रत्येक घरात स्वयंसेवक जाऊन संघाची माहिती सांगणार आहे. त्यात जातीधर्मभेदविरहीत ही मोहीम राबवली जाणार आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस, ठाकरे शिवसेना, आरपीआय, समाजवादी आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांसह गांधीवादी कार्यकर्त्यांशीही ते संवाद साधणार आहेत.




