नाशिक | फारूक पठाण | Nashik
नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे (Nashik NMC Election) वातावरण तापत असताना, पडद्यामागील राजकीय समीकरणांमध्ये डावपेच आखले जात आहे. विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते मंडळी आपल्या पक्षासह उमेदवारांसाठी नियोजन करीत असतांना २०१२ साली मनसेला सत्ता मिळून देण्यात महत्वाची भुमिका बजावणारे वसंत गिते (Vasant Gite) यंदा शिवसेना ठाकरे गटासाठी (Shivsena UBT) निर्णायक ठरणार का, अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे पुत्र प्रथमेश गिते पक्षाचे महानगरप्रमुख आहेत, मात्र मदार पिता वसंत गितेंवरच राहणार असल्याचे दिसत आहे.
२००२ सालच्या मनपा निवडणुकीत (NMC Election) ते प्रभाग २७(क) मधून बिनविरोध निवडून आले होते, तर १९९७ साली ते महापौर झाले होते. त्याचप्रमाणे २००९ साली ते मनसेकडून (MNS) आमदार झाले होते. नगरसेवक,महापौर व आमदार म्हणून मागील सुमारे चार दशकापासून नाशिकच्या राजकारणातील जाणकार रणनीतिकार म्हणून वसंत गिते यांची ओळख आहे. २०१२ च्या नाशिक महापालिका निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा करिष्मा व प्रदेश सरचिटणीस असलेले वसंत गिते यांच्या नियोजनामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तब्बल ४० नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळाले होते. त्याच विजयातून नाशिकला मनसेचा महापौर मिळाला आणि पक्षाला शहरात वेगळी ओळख निर्माण झाली.
आज राजकीय वारे वेगाने बदलत असताना पुन्हा एकदा गिते यांच्याच दारी महत्वाची भूमिका आली आहे. त्यांचे पुत्र आणि माजी उपमहापौर प्रथमेश गिते (Prathmesh Gite) हे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक महानगरप्रमुख असून, संघटनात्मक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.मात्र प्रत्यक्षात, संघटनाचा धुरा, राजकीय संपर्क, जमिनीवरील कामाचा खोल अनुभव आणि धोरणात्मक नियोजन या सर्व बाबतीत वसंत गिते यांची कमांड आजही सर्वाधिक प्रभावी मानली जात आहे. त्यामुळे ठाकरे गटात नाशिकमधील अनेक घडामोडी गिते यांच्या मार्गदर्शनाखालीच घडताना दिसत आहेत.
जुन्या नेटवर्कचा आधार
शिवसेना उबाठा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मनसे आणि डाव्या आघाडीमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला चर्चेत आहे. काँग्रेसने अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नसली तरी ‘नवा मिडू नको’ अशी त्यांची भूमिका आहे. या ताणतणावात, गिते यांची राजकीय पकड, जुन्या नेटवर्कचा आधार आणि विरोधकांना भिडण्याची शैली हे ठाकरे गटाचे सर्वात मोठे शस्त्र ठरत आहेत. प्रभाग क्रमांक १५ मध्ये यंदाच्या आरक्षण बदलामुळे राजकीय गणिते बदलू शकतात. २०१७ मध्ये या प्रभागातून अर्चना थोरात, सुमन भालेराव आणि प्रथमेश गिते हे भाजपकडून विजयी झाले होते. यंदा एक जागा ओबीसी गटासाठी राखीव झाल्याने पुरुष आणि महिलांना समान संधी मिळाली आहे. मात्र या प्रभागातली खरी रंगत वाढवणारा मुद्दा म्हणजे गिते यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजपकडून त्यांना दिले जाणारे थेट आव्हान. त्यांचे पुत्र प्रथमेश यांनाही यंदा कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागणार असून प्रभागात शिवसेनेची पकड गिते पितापुत्रावरच अवलंबून राहणार आहे.





