येवला | प्रतिनिधी | Yeola
तालुक्यात परतीच्या पावसाने (Rain) विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेती पिकांचे (Crops) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशाही आता धुळीस मिळाल्या आहेत. भाटगाव येथे अण्णासाहेब मिटके यांच्या घराची भिंत कोसळल्याने नुकसान झाले. तर रायते व चिचोंडी खुर्द या गावांना जोडणाऱ्या अगस्ती नदीवरील पुलाचा भराव दुसऱ्यांदा आलेल्या पुराने वाहून गेला आहे.
गेल्या पाच महिन्यापासून तालुक्यात (Yeola Taluka) सतत पाऊस सुरू आहे. मंगळवारीही, रात्रभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. त्या नंतर रोज कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी सुरू होती. तर शनिवारी (दि.२५) दुपारपासून वातावरणात प्रचंड उकाडा उष्णता जाणवत होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तर संपूर्ण काळोख पसरला होता आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली ती रात्रभर सुरूच होती.
एरंडगाव, धुळगाव, कोटमगाव, चिचोंडी, साताळी, नेउरगाव, रस्ते सुरेगाव, तळवाडे, कौटखेडा, गौंडगाव, गारखेडा, पिंपळखुटे खुर्द व बुद्रुक, सायगाव, नगरसुल, अंदरसुल, कातरणी, विखरणी, जळगाव, बदापुर, निमगाव मढ, गुजरखेडे, कानडी,खैरगव्हान, देवरगाव,धुळगाव सह परीसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. जवळपास सर्वच गावात हा पाऊस कोसळत होता. या पावसाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान केले. पात धरू लागलेले कांदे व लावणी साठी तयार करण्यात आलेले रोप पुन्हा पाण्यात गेल्याने वाया गेले आहे.
दरम्यान, या एका रात्रीत येवला शहरात ४७ मीमी, अंदरसुल मंडळात ६७ मीमी, नगरसुल ५३ मीमी, पाटोदा ५५ मीमी, सावरगाव ६२ मीमी, जळगाव नेऊर ५२ मीमी अशी एकूण ३३६ मीमी पावसाची नोंद झाली. यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच पाऊस चांगल्या प्रमाणात बरसल्याने परिसरातील सर्वच पिके एकदम बहरत असताना शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास मात्र परतीच्या पावसाने हिसकावला आहे. अजून दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून यावर्षी कोणतीही पिके हाती येण्याची शक्यता मात्र मावळली आहे.
तसेच काही भागात पीक नुकसान भरपाई मिळाली असली तरी अनेक गावातील शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत आता पुन्हा एकदा पावसाने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विखरणी येथील जनार्धन शेलार यांच्या मका पिकात पाणी साचले होते. आता या पाण्याचा लवकर निचरा होणार नाही त्यामुळे हातात आलेले पीक सोडून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशीच परिस्थिती तालुकाभर आहे.




