नाशिक | Nashik
कालपासून (शनिवार) सुरु असलेल्या मुसळधार पावसाने नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे ग्रामीण भागात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे गोदाघाटावरील लहान मोठे मंदिरे पाण्याखाली गेली असून, दुतोंड्या मारुती देखील बुडाला आहे.
गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने रामकुंड परिसरातील (Ramkund Area) जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पुढील काही दिवस परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. तर पूर परिस्थिती बघण्यासाठी आज रविवारच्या दिवशी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्याला (Nashik District) परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. आतापर्यंत या पावसामुळे १४ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून ६५ गावातील २० हजारांहून अधिक शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत. यात कापूस ५११९ हेक्टर, कांदा १७५३ हेक्टर, मका ४६३१ हेक्टर या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. तसेच, जिल्ह्यातील मालेगाव नांदगाव, येवला, सुरगाणा या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे.




