उगाव | वार्ताहर | Ugaon
अतिवृष्टीमुळे द्राक्ष शेतीचे झालेले मोठे नुकसान, कर्जाचा वाढलेला डोंगर आणि कर्जमाफीबाबत राज्य व केंद्र सरकारच्या उदासीन भूमिकेला कंटाळून निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) उगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी कैलास यादव पानगव्हाणे यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले. सोमवारी (दि. ३ नोव्हेंबर) सकाळी ८.३० च्या सुमारास त्यांनी द्राक्ष बागेतच हे टोकाचे पाऊल उचलले.
पानगव्हाणे यांच्या द्राक्षबागेची (Vineyard) ऑक्टोबर छाटणी करून अनेक दिवस झाले होते. पानगव्हाणे रोज सकाळी द्राक्षबागेत जाऊन द्राक्षवेलींना फुलोरा आला की नाही ते बघत होते. काल नेहमीप्रमाणे द्राक्षबागेत गेले. मात्र, कालही वेलींना फुलोरा न दिसल्याने बँक व सावकाराचे कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? यामुळे हतबल होऊन द्राक्षबागेतच त्यांनी विषारी औषध प्राशन करून घरी आले. विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना खूप अस्वस्थ होऊ लागल्याने त्यांच्या पत्नीने घाबरून त्यांचे पुतणे शुभम पानगव्हाणे यांना दूरध्वनी करून बोलावून घेतले, तोपर्यंत त्यांच्या तोंडाला फेस येऊन ते बेशुद्ध पडले होते.यानंतर त्यांना कुटुंबातील सदस्य व शेजारील मंडळींनी निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
दरम्यान, याबाबत निफाड पोलीस ठाण्यात (Niphad Police Station) अकस्मात मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव करत आहे. तर निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना यासंदर्भात अहवाल प्राप्त झाला असून अधिक माहिती कृषि अधिकारी यांचेमार्फत संकलित करून ती जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येईल, असे सांगितले. कैलास पानगव्हाणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजई असा परिवार आहे. पानगव्हाणे यांच्या पार्थिवावर उगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कर्जमुक्ती व हमीभाव किंवा शेतकऱ्यांना एकरी जास्तीत जास्त मदत करण्याची गरज आहे. कारण कैलास पानगव्हाणे यांनी जो टोकाचा निर्णय घेतला, हा शासनाच्या उदासीन भूमिकेमुळेच घेतला आहे. त्यामुळे शासनाने आता त्यांच्या परिवाराला मोठी आर्थिक मदत मिळवून त्यांच्या परिवारामागे उभे राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
सोमनाथ पानगव्हाणे, मा. सभापती, निफाड पं.स



