Friday, January 23, 2026
HomeराजकीयHarshwardhan Sapkal : नवी मुंबई विमानतळाला नरेंद्र मोदींचे नाव देण्याचा भाजपचा डाव;...

Harshwardhan Sapkal : नवी मुंबई विमानतळाला नरेंद्र मोदींचे नाव देण्याचा भाजपचा डाव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप

मुंबई । Mumbai

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि नवी मुंबईतील विमानतळांचा मुद्दा राजकीय पटलावर चांगलाच तापला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरावरून आता नवा वाद उफाळून आला आहे. भाजपला या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यायचे नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा त्यांचा डाव आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

विमानतळाचे नाव आणि राजकीय श्रेयवाद नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून सध्या श्रेयवादाची लढाई सुरू आहे. एकीकडे भाजप हे विमानतळ सुरू झाल्याचे श्रेय लाटत असताना, दुसरीकडे महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. मात्र, तीन वर्षे उलटूनही केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही. याच मुद्द्यावरून सपकाळ यांनी टीका करताना म्हटले की, भाजपला केवळ मोदींचे नाव मोठे करायचे असून त्यांना स्थानिक नेत्यांच्या योगदानाची दखल घ्यायची नाही.

YouTube video player

गुंडगिरी आणि बिनविरोध निवडणुकांवर प्रश्नचिन्ह हर्षवर्धन सपकाळ यांनी केवळ नामांतराच्या मुद्द्यावरच नाही, तर राज्यातील निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले. “बिनविरोध निवडून आलेले उमेदवार हे गुंडगिरीच्या जोरावर निवडून आले आहेत. ईव्हीएमवर ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध असताना निवडणुका बिनविरोध कशा होऊ शकतात?” असा सवाल त्यांनी केला. अशा ठिकाणी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, अकोट आणि परळीमध्ये भाजप-शिवसेनेने एमआयएमसोबत छुपी युती केल्याचा दावाही त्यांनी केला.

बदलापूर प्रकरण आणि महिला सुरक्षेवरून टीका बदलापूर येथील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवक पद दिल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत सपकाळ यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. “भाजप आता बलात्कारी लोकांना पक्षात घेऊन त्यांना आशीर्वाद देत आहे. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे असलेल्यांना पक्षात स्थान देणे दुर्दैवी आहे. सध्याची परिस्थिती पाहता ‘बेटी बचाव’ नाही, तर ‘भाजपपासून बेटी वाचवा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

भूमिपुत्रांचा आंदोलनाचा इशारा विमानतळाच्या नामांतरासाठी भूमिपुत्र समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. केंद्र सरकारकडून प्रलंबित असलेल्या प्रस्तावामुळे स्थानिक आगरी-कोळी बांधवांमध्ये तीव्र नाराजी आहे. खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी जाहीर केले आहे की, आचारसंहिता संपल्यानंतर मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल. जोपर्यंत दि. बा. पाटील यांच्या नावाचा अधिकृत निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबईतून न हटण्याचा निर्धार भूमिपुत्रांनी केला आहे.

मराठवाड्यातील काँग्रेस आणि भाजपमधील जुन्या, ज्येष्ठ नेत्यांची नावे पुसून टाकण्याचे काम ‘नवी भाजप’ करत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी यावेळी केला. या सर्व आरोपांमुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये विमानतळाचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्या

पासपोर्ट

Nashik News: परदेशगमन, शिक्षण, रोजगार, पर्यटनासाठी आठ वर्षात ‘एवढ्या’ नाशिककरांनी काढले...

0
नाशिक | प्रतिनिधीपरदेशगमन, शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी वाढलेल्या मागणीमुळे नाशिक शहरात पासपोर्टधारकांची (पारपत्र) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१८ ते २०२५) तब्बल...