Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याValentine Day च्या दिवशी 'काऊ हग डे'; आव्हाडांची तुफान टोलेबाजी, म्हणाले, “गायीला...

Valentine Day च्या दिवशी ‘काऊ हग डे’; आव्हाडांची तुफान टोलेबाजी, म्हणाले, “गायीला मिठी कशी मारायची? मागून मिठी मारली तर…”

मुंबई | Mumbai

जगभरात अनेकांना व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) साजरा करण्याचे वेध लागले आहेत. भारतात व्हॅलेंटाइन्स डे कायम चर्चेचा विषय राहिला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या पशु कल्याण मंडळानं एक मार्गदर्शक पत्रक जारी केलं आहे. त्या पत्रकानुसार गायप्रेमी नागरिकांनी १४ फेब्रुवारीला देशभर ‘काऊ हग डे’ (Cow Hug Day) साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मंडळानं वैदिक परंपराचा दाखला देखील दिला आहे.

- Advertisement -

सरकारनं ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचं आवाहन केल्यामुळं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक लोकांनी या कार्यक्रमात सहभागी न होण्याचं ठरवलं आहे तर काही लोकांनी गायींप्रती संवेदना व्यक्त करत ‘काऊ हग डे’ साजरा करणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तुफान टोलेबाजी केली आहे. (Cow Hug Day Viral Video)

केंद्र सरकारची गाईला मिठी मारण्याची कल्पना आपल्याला फार आवडली. मात्र, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी मिठी मारण्यासाठी गाय कुठून आणायची? केंद्र सरकार गाईची सोय करणार आहे का? असा सवाल आव्हाडांनी विचारला आहे. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते. (Jitendra Awhad on Cow Hug Day)

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘व्हॅलेंटाईन डे हा दिवस प्रेमाचे प्रतिक आहे. व्हॅलेंटाईन डेला अनेक वर्षाची परंपरा आहे आणि याचे स्वरूप बदलत गेले. भारतातले स्वरूप अजूनच बदलले. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस आहे, त्यामध्ये आई ही प्रेमाचे प्रतिक असू शकते. गाईवर प्रेम करा अस सांगण्यात आले आहे. त्याला हरकत नाही. पण गायी आणायच्या कुठून? शासनाकडून गायी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत का?’ असा सवाल त्यांनी विचारला.

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘गाईला मिठी मारताना ती कुठून शिंग तर मारणार नाही. मागून मिठी मारली तर लाथ मारणार नाही ना? गायीचे पोट खूप मोठे असते. एवढ्या मोठ्या पोटाला मिठी कशी मारणार? मिठी मारायची कशी हे सरकार दाखवणार का? गायीला मिठी कशी मारायची याचे प्रात्यक्षिक सरकारने २४ तास आधी टीव्हीवर दाखवावे. तरुणांना गायी उपलब्ध करून द्याव्यात,’ अशाप्रकारची टोलेबाजी आव्हाड यांनी केली आहे.

सरकारनं केलेलं आवाहन काय?

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या पशु कल्याण मंडळानं एक मार्गदर्शक पत्रक जारी केलं आहे. पशु कल्याण मंडळानं जारी केलेल्या आवाहन पत्रकात गाय भारतीय संस्कृतीचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचं सांगण्यात आलं आहे. पशु संपत्ती आणि जैव विविधतेचं उदाहरण म्हणून गायीकडे पाहतो. गायीला कामधेनू आणि गौमाता म्हटलं जातं. निसर्गाला आई प्रमाणं संवर्धित करण्याचं काम गाई करते.

पाश्चिमात्य संस्कृतीमुळं वैदिक परंपरा मागं पडल्या आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीमुळं आपल्याला सांस्कृतिक आणि समृद्ध वारशाचा विसर पडल्याचं पशु कल्याण मंडळानं म्हटलं आहे. गायीपासून होणाऱ्या लाभांचा विचार करता गायीला मिठी मारल्यास भावनिक समृद्धता मिळू शकते. यामुळं सामुदायिक, वैयक्तिक आनदांत वाढ होईल. त्यामुळं गायप्रेमी नागरिकांनी १४ फेब्रुवारीच्या दिवशी गायीला मिठी मारावी आणि जीवन आनंदी बनवाव, असं आवाहन पशु कल्याण मंडळानं केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या