पुणे | Pune
आज (मंगळवार) दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे पार पडत आहे. यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा (Sharad Pawar NCP) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीरात मेळावा पार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपल्याकडे असणारे पद सोडण्याचे मोठे विधान वर्धापन दिनाच्या मेळाव्यात केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, “मला शरद पवारांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी (Party President) सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे. त्यामुळे मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा. पक्ष २७ व्या वर्षात पदार्पण करत असून, देशपातळीवर या पक्षाने मोठे योगदान दिले आहे”, असेही त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, “राष्ट्रवादी पक्षाची स्थापन झाली त्यावेळी शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) लाखोंचा जनसमुदाय पवार साहेबांची भूमिका ऐकण्यासाठी एकत्रित आला होता.१९९९ पासून २०१४ पर्यंत सतत पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिला. या राज्याच्या जडणघडणीतले अनेक निर्णय सत्तेत असताना या पक्षातल्या सगळ्या धोरणांना घेण्याचे काम केले. या १४ वर्षाच्या कालखंडात १५ वर्षाच्या कालखंडात पक्षही अतिशय सामर्थ्याने वाढवण्याचे काम झाले. पण १४ वर्ष उजाडले भाजपची सत्ता आली आणि बरीच लोकं आमच्या रेल्वेतून उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसायला लागेल. मात्र, आपण सगळे पवार साहेबांच्या मागे निष्ठेने राहीलो”, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
तसेच “सुप्रिया ताईंनी (Supriya Sule) सिंदूर आॕपरेशनबद्दल भूमिका मांडली. त्यांचे अभिनंदन. आपले पक्षीय मदभेद असतील मात्र परराष्ट्र धोरणाचा प्रश्न येतो तेव्हा या देशाच्या संरक्षणाची भूमिका पुढे मांडावी लागते. त्या ठिकाणी आपल्या पक्षाने आणि आदरणीय पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना सांगितलेले आहे की देश हिताची भूमिका ही सर्वप्रथम घेतली पाहिजे. शत्रूला धडा शिकवण्याची वेळ येते त्यावेळी देश एकसंघ असला पाहिजे आणि म्हणून तेव्हा देशाच्या कायम बरोबर राहण्याचे काम पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात केले”, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.