Tuesday, January 20, 2026
HomeराजकीयNarendra Modi : नितीन नबीन हे माझे नवीन बॉस..!; PM नरेंद्र मोदींचे...

Narendra Modi : नितीन नबीन हे माझे नवीन बॉस..!; PM नरेंद्र मोदींचे वक्तव्य

दिल्ली । Delhi

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, नितीन नबीन यांची पक्षाचे नवीन आणि सर्वात युवा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी या निवडीची घोषणा केली.

- Advertisement -

राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन नबीन हे एकमेव उमेदवार होते आणि त्यांच्या समर्थनार्थ एकूण ३७ अर्ज दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः नबीन यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता, ज्यामुळे त्यांची ही निवड बिनविरोध आणि सर्वसंमतीने पार पडली. या निवडीनंतर पंतप्रधान मोदींनी नितीन नबीन यांना पुष्पहार घालून त्यांचे मनापासून अभिनंदन केले.

YouTube video player

या ऐतिहासिक निवडीच्या निमित्ताने आयोजित ‘भाजप संघटन पर्व’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मावळते अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.

मोदी म्हणाले की, भाजप हा केवळ एक राजकीय पक्ष नसून ती एक संस्कृती आणि संस्कारांनी बांधलेले कुटुंब आहे. पदे ही केवळ एक व्यवस्था असून जनतेची सेवा करणे हेच पक्षाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. भाजपमध्ये नेतृत्व बदलले तरी पक्षाची ध्येयधोरणे आणि दिशा नेहमीच स्थिर राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाषणादरम्यान एक हलकाफुलका क्षण तेव्हा पाहायला मिळाला, जेव्हा पंतप्रधानांनी नबीन यांचा उल्लेख ‘बॉस’ असा केला. मोदी म्हणाले की, “मी देशाचा पंतप्रधान असलो किंवा २५ वर्षे सरकारचा प्रमुख असलो तरीही, सर्वात आधी मी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. आता नितीन नबीन हे पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे ते माझे बॉस आहेत.”

पंतप्रधानांच्या या विधानाने सभागृहात एकच हशा पिकला. भाजपने गेल्या ११ वर्षांत हरियाणा, आसाम, त्रिपुरा आणि ओडिशामध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा आणि तेलंगणा-पश्चिम बंगालमध्ये निर्माण केलेल्या प्रभावाचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.

पंतप्रधानांनी यावेळी भाजपच्या सुशासन मॉडेलवरही भाष्य केले. स्वातंत्र्यानंतर देशाने काँग्रेसची घराणेशाही आणि डाव्या विचारसरणीची अस्थिर मॉडेल्स पाहिली आहेत, मात्र आज देशाला भाजपचे स्थैर्य आणि संवेदनशीलतेचे विकास मॉडेल खुणावत आहे, असा दावा त्यांनी केला. ‘जल जीवन मिशन’चे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, केवळ ५-६ वर्षांच्या कालावधीत १२ कोटींहून अधिक कुटुंबांना नळाचे पाणी देऊन माता-भगिनींचे दुःख दूर करण्याचे काम सरकारने केले आहे. नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली भाजप आता एका नवीन उर्जेसह आगामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झाला आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पंधरा दिवसांपूर्वी वडिलांचा अपघाती मृत्यू अन् नंतर मुलाची...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik वडिलांच्या निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या (Suicide Death) केल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली...