नवी दिल्ली –
कोणीही एमएसपी व्यवस्था किंवा शेतकर्यांची जमीन त्यांच्यापासून बळकावून घेणार नाही. नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार्या
शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीतही किमान हमी भावाची व्यवस्था कायम राहील आणि मंडीदेखील बंद होणार नाही, असे ते म्हणाले.
ते दिल्लीत बोलत होते. या कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमत (एमएसपी) संपुष्टात येईल, अशी भीती काँगे्रस आणि इतर विरोधी पक्ष पसरवत आहेत. हा केवळ भ्रम आहे. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी विरोधक खोटे बोलत आहेत, असा आरोपही शाह यांनी केला.
विरोधक शेतकर्यांची किमान आधारभूत किंमतीवरुन दिशाभूल करत आहेत. मी हे स्पष्ट करु इच्छितो की, किमान आधारभूत किंमत ही व्यवस्था कायम राहिल. तसेच तिन्ही कृषी कायदे हे शेतकर्यांच्या हिताचे आहेत असेही ते म्हणाले.