शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा यांच्याबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त व आक्षेपार्ह माहिती पसरवणार्या विरोधात साईबाबा संस्थान ट्रस्ट आक्रमक झाले आहे. चुकीची माहिती प्रसारित करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणार्यांना आता थेट त्यांच्या घरी जाऊन नोटीस बजावली जाणार असल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. साई संस्थानचे सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी आपल्या पथकासह शुक्रवारी कारवाईसाठी रवाना झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही व्यक्तींकडून साईबाबांबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याच्या तक्रारी भाविकांनी संस्थानकडे केल्या होत्या.
या तक्रारींची खात्री केल्यानंतर साईबाबा संस्थानने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी उत्तर भारतातील काही व्यक्तींनीही साईबाबांबाबत आक्षेपार्ह विधान करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी संस्थानने तातडीने संबंधितांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करत न्यायालयीन कारवाई सुरू केली होती. राहाता न्यायालयातही दावे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात दिल्लीतील पंडित अजय गौतम यांना न्यायालयाने समन्स बजावले होते. त्यांनी राहाता न्यायालयात हजेरी लावून लेखी माफीनामा दिला. तसेच शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत आरतीस उपस्थिती लावली होती. या घटनेनंतर संस्थानने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर भूमिका घेतली आहे.
सध्या सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करणार्या 15 जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासह राहाता न्यायालयात दावेही दाखल करण्यात आल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील काही व्यक्ती साईबाबांबद्दल दिशाभूल करणारे पोस्ट प्रसारित करत असल्याच्या तक्रारी संस्थानकडे आल्या होत्या. तपासाअंती 10 जणांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांकडून संबंधितांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू असून, सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी स्वतः पथकासह त्यांच्या घरी जाऊन नोटीस देणार आहेत.
सोशल मीडियावर नकारात्मक आशयाला अधिक प्रसिद्धी मिळते आणि त्यातून आर्थिक लाभ मिळतो. त्यामुळे काही जण प्रसिद्धीसाठी चुकीची माहिती देण्याचा मार्ग स्वीकारत असल्याचे सोशल मीडिया सल्लागार सुकृत मिराणे यांनी सांगितले. मात्र सकारात्मक मार्गानेही आर्थिक उत्पन्न मिळवता येऊ शकते, याचा विचार तरुणांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. जगभरात साईबाबांचे लाखो भक्त असून शिर्डीत भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही जण प्रसिद्धीसाठी अपप्रचार करत असले, तरी त्याचा साईभक्तांच्या श्रद्धेवर किंवा शिर्डीच्या किर्तीवर कोणताही परिणाम होणार नाही. साईबाबांवरील भक्तांची श्रद्धा अढळ असून साईबाबा संस्थान अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाई करण्यास कटिबद्ध असल्याचा ठाम संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.




