Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

मुंबई l Mumbai

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्र अनलॉक होत असातानाच राज्यातील काही जिल्ह्यांत पुन्हा करोनानं डोकं वर काढलं आहे. करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनानंही कंबर कसली आहे.

- Advertisement -

दरम्यान, वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आता अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून एक आठवड्याचा कडकडीत बंद असणार आहे. अनलॉकनंतर महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येत आहे.

करोनाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमरावतीमध्ये ६० टक्के भागात करोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर १२ प्रतिबंधित क्षेत्र देखील जाहीर करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पुढील ७ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तर अमरावती जिल्ह्यामध्ये आजही विकेंण्ड लॉकडाऊन सुरू आहे. उद्या संध्याकाळपासून हा लॉकडाऊन सुरू होणार आहे. उद्या दिवसभर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान या विभागातील पाच जिल्ह्यांच्या (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम) दृष्टीनं कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी सुधारित निर्देश लागू करण्यात आले आहेत. यात सर्व प्रकारची दुकाने आणि आस्थापना ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रातील जे उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आलेली आहे, ते उद्योग नियमितपणे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये ही १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील. तसेच सर्व प्रकारच्या खासगी कार्यालयातील आस्थापना या एकूण १५ टक्के किंवा कमीत कमी १५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील. ग्राहकांनी खरेदीसाठी जवळ असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांच्याकडे खरेदी करावी. शक्यतो दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील. लग्न समारंभाकरिता वधू व वर पक्षासह पंचवीस व्यक्तींना परवानगी राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालय येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे इत्यादी कामांकरिता परवानगी राहील.

मालवाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर तीन प्रवासी, तीन चाकीमध्ये चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील. आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह सोशल डिस्टंसिंग व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीसाठी परवानगी राहील. यासाठी विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे नियोजन करतील.

सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळी दहा व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात सुरु राहील. भाजी मंडई सकाळी तीन ते सहा या कालावधीत सुरू राहील. सदर मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहिल. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलने या कालावधीत बंद राहतील.

येत्या काळात सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहतील. आठवडाअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी दुकाने बंद राहतील. आठवडाअखेर असलेल्या संचारबंदीच्या वेळी दूध विक्रेते यांची दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत आठवड्याचे संपूर्ण सात दिवस नियमितपणे सुरू राहतील. सद्यस्थितीमध्ये मिशन बिगीन अगेन अंतर्गत जी सूट देण्यात आलेली होती, ती रद्द करून सदरचे निर्बंध १ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत लागू करण्यात येत असुन, याबाबतचे निर्देश विभागीय आयुक्त यांनी एका पत्राद्वारे दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या