अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कांद्याच्या कमी अधिक दरवाढीने शेतकरी बुचकळ्यात पडला आहे. कांद्याला भाववाढ नाही अन् वाढलेला उत्पादन खर्च, तसेच कांदा बियाणांची होणारी दरवाढ यामुळे यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. कांद्याचे दर जैसे थे, मात्र कांद्याच्या बियाण्याच्या दरात वाढ झाली आहे. विविध कंपनीच्या कांदा बियाण्याच्या दरात एक हजार रुपयांपर्यंत वाढ केल्याने यंदा कांदा लागवड करावी की नाही? अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी दिसत आहे.
नगर जिल्हा कांद्याचे माहेरघर मानले जाते. त्यात मागील रब्बी हंगामातील कांद्याला चांगला दर मिळेल या भरवश्यावर अनेक शेतकर्यांनी आपला कांदा अजूनही चाळीत बंदिस्त करून ठेवला आहे. मात्र, दरात फारशी सुधारणा न होता कांद्याचे दर जवळपास जैसे थे आहे. वाढत्या महागायी सोबतच कांदा लागवडीचा वाढता खर्च, कांदा बियाणाच्या विविध कंपन्यांनी रब्बी हंगामातील कांदा बियाण्यात प्रति किलो केली वाढ यामुळे शेतकर्यांचे कांदा पिकाचे नियोजन अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मागील रब्बी हंगामात कांदा बियाण्याचे दर प्रतिकिलो 2 हजार 500 ते अडीच हजार रुपये दिसून आले. त्यात काही शेतकर्यांनी कांदा बियाणे साडेचार ते पाच हजार रुपये पायलीनूसार विकले. मागील वर्षी विविध कंपन्यांच्या कांदा बियाण्याची पायली हिशेबाने विचार केला तर साडेसात हजार रुपये दराने विक्री करण्यात आली. मात्र, यंदा तर किलोमागे 500 ते एक हजार रुपयांनी दर वाढविल्याने शेतकर्यांचे आता कांदा पीक अजून खर्चिक होणार आहे. मागील रब्बी हंगामात कांदा बियाणे अडीच हजार प्रतिकिलो मिळत होते. त्यात रासायनिक खताची 50 किलोची गोणी 1 हजार 200 रुपयांना मिळाली. कांदा लागवडीचा खर्च एकरी 12 हजार रुपयापर्यंत होता. यंदा बियाणासह अन्य दरवाढीचा फटका कांदा लागवडीवर होण्याची शक्यता आहे.
मागील हंगामातील कांदा काढल्यानंतर शेतकर्यांच्या शेतात जागेवरच व्यापारी येऊन 11 ते 12 रुपयांपर्यंत किलोने कांदा खरेदी करीत होते. त्यात काही शेतकर्यांनी पैसे करून घेतले; पण काहींना वाटले की जागेवर बारा रुपयांपर्यंत कांदा खरेदी केला जात आहे, म्हणजे भविष्यात कांद्याला चांगला दर मिळेल. पण सुमारे आठ ते दहा महिन्यांच्या कालावधीनंतरही कांदा मार्केट थंडच असल्याचे दिसत आहे. त्यात आता चाळीतील कांद्याला प्रारंभी अतिउन्हाच्या झळा बसल्या. त्यानंतर अवकाळी पावसाचा शिपका बसला. वातावरणातच बदल झाल्याने आता कांदा आता खराब होऊन चाळीत सडू लागला आहे. मार्केटला विकायला आणावा तर दर नाही. चाळीत ठेवा तर सडू लागल्याने शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे.




