Monday, May 5, 2025
Home Blog Page 42

Devendra Fadnavis : “नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवली गेली”; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, रोख नेमका कुणाकडे?

0
Devendra Fadnavis : "नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवली गेली"; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, रोख नेमका कुणाकडे?

मुंबई | Mumbai

नाशिकच्या (Nashik) काठे गल्ली परिसरातील (Kathe Galli Area) अनधिकृत दर्ग्याच्या पाडकामावेळी मंगळवार (दि. १५) रोजी पहाटे दोन हजारांहून अधिकच्या जमावाने पोलिसांवर (Police) तुफान दगडफेक केली होती. या दगडफेकीत एकवीस पोलीस जखमी झाले होते. यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. तसेच पाठलाग करून त्यांची धरपकड केली होती. याप्रकरणी १५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत ३० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की, “नाशिकमधील हिंसाचार (Violence) सुनियोजित होता. ठरवून दंगल (Riot) घडवण्याचा याठिकाणी प्रयत्न झाला. न्यायालयाच्या (Court) निर्णयानंतर तिथल्या नागरिकांनी स्वत: ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितले आणि त्याची सुरुवातही त्यांनीच केली. त्याचवेळी जी मंडळी दंगलीत दिसत आहेत त्यांनी जाणीवपूर्वक पोलिसांवर दगडफेक केली आणि दंगा केला. म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई (Action) करण्यात येत आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

दरम्यान, काठे गल्ली सिग्नल परिसरातील रस्ता चार दिवसानंतर वाहतुकीसाठी आजपासून खुला झाला आहे. पोलिसांनी रस्त्यावरील बॅरीकेट्स हटवले आहेत. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी देखील अनधिकृत बांधकाम परिसरात पोलिसांचा (Police) बंदोबस्त मात्र कायम आहे. काठे गल्ली सिग्नल परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र अनाधिकृत बांधकामावरील कारवाईनंतर शहरात कोणताही अनुचित न घडल्याने पोलिसांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.

१५०० जणांवर ४२ कलमांनुसार गुन्हा

पोलिसांवर हल्ला व जमाव जमविल्याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात एकूण १५०० जणांवर भारतीय न्याय संहितेची कलमे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान, शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम व पोलीस (अप्रितीची भावना चेतावने) अधिनियम अशा ४२ हून अधिक कलम व अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तशी फिर्याद सहायक निरीक्षक सतीश शिरसाठ यांनी सरकार पक्षाच्यावतीने दिली आहे. तर, तपास सहायक निरीक्षक सुधीर पाटील करत आहेत. अटकेतील संशयितांना जामीन मिळण्याची शक्यता धूसर आहे.

Ahilyanagar sarpanch reservation : आरक्षण सोडत निश्चित; ६२५ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज

0

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील १ हजार २२३ ग्रामपंचायतीचे पुढील पाच वर्षांसाठी तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात करण्यात आले आहे. सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गाचे तहसीलस्तरावर गावनिहाय आरक्षण २३ एप्रिल तर उपविभागीय पातळीवर महिला सरपंच आरक्षण २४ व २५ एप्रिल रोजी निश्चित केले जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ६२५ ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज राहणार आहे. तर ९६ ग्रामपंचायतीमध्ये २०२१ ला आरक्षण काढण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी जुनेच आरक्षण कायम राहणार आहे.

जिल्ह्यातील पुढील पाच वर्षासाठीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जाहीर केला आहे. यात जिल्ह्यातील १४ तालुक्यातील सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गाचे तहसीलस्तरावर गावनिहाय आरक्षण २३ एप्रिल रोजी अंतिम केले जाणार आहे. तर २४ एप्रिल रोजी उपविभागीय कार्यालयात अकोले २४, जामखेड ३०, श्रीरामपूर २७, कोपरगाव ३८, शेवगाव ४८, श्रीगोंदा ४४, नगर ५४ ग्रामपंचायतीसाठी महिला आरक्षण सोडत होणार आहे. २५ एप्रिल रोजी संगमनेर ७३, कर्जत ४७, राहुरी ४३, राहाता २६, पाथर्डी ५५, पारनेर ५८, नेवासा ५८ ग्रामपंचायतीसाठी महिला आरक्षण निश्चित होणार आहे.

जिल्ह्यातील १ हजार २२३ ग्रामपंचायतींपैकी ६२४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच होण्याची संधी आहे. यात ३१२ ठिकाणी महिला आरक्षण आहे. ३३० ठिकाणी ओबीसीसाठी सरपंच पदाचे आरक्षण असून, यात १६९ महिलांना संधी आहे. ११९ ठिकाणी एसटी आरक्षण असून, यात ६२ ठिकाणी महिला आरक्षण आहे. तसेच १५० ठिकाणी एससी आरक्षण असून, यात ७८ महिला सरपंचांचा समावेश आहे. जिल्ह्यात खुल्या प्रवर्गात ६२४ सरपंच निघणार असून या ठिकाणी३१८ ठिकाणी महिलांना सरपंच होण्याचा मान मिळणार आहे. जानेवारी २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या ९६ ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आरक्षणानुसार न झाल्याने ते आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. उर्वरित १ हजार २२३ ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत होणार आहे.

सोडतीचा अहवाल सादर करा

जिल्ह्यात २३, २४ आणि २५ एप्रिलला काढण्यात येणाऱ्या सरपंच आरक्षणाचा अहवाल २५ तारखेला दुपारपर्यंत नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश डॉ. आशिया यांनी काढले आहेत.

Dada Bhuse : राज्यातील शालेय शिक्षकांनाही ड्रेसकोड लागू होणार? मंत्री भुसेंचे सूतोवाच

0

मुंबई | Mumbai

केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरण राज्यात राबवत असताना शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा हा विषय सक्तीचा करण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता शिक्षणमंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी राज्यातील शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू (Dress Code School Teachers Maharashtra) करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांच्या (Teachers) गणवेशाबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, “शिक्षकांना राज्य पातळीवर एकच गणवेश लागू होणार नाही. पण, शिक्षकांनी शाळेच्या स्तरावर आपसात ठरवून एक गणवेश निश्चित करावा. डॉक्टर, वकील यांना त्यांच्या गणवेशावरून समाजात ओळखले जाते. त्यांना मान दिला जातो. त्याच पद्धतीने शिक्षकांनाही त्यांच्या शाळेच्या गावात मान मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिक्षकांच्या गणवेशाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

तसेच शिक्षकांवरील अशैक्षणिक (Non-Academic) कामे लवकरच कमी केली जातील. ज्यामुळे त्यांना त्यांच्या अध्यापणाच्या मूळ कामाकडे अधिक लक्ष देता येईल, असेही त्यांनी म्हटले. तर लवकरच शिक्षकांना गणवेश लागू केला जाईल. त्यासाठी आवश्यक म्हणून खारीचा वाटा म्हणून राज्य सरकार (State Government) थोडाफार खर्चही उचलणार असल्याचे दादा भुसे म्हणाले. .

दरम्यान, शिक्षकांनी कोणते कपडे घालावेत याबाबत वस्त्रसंहिता याआधीच लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुद्दा शिक्षकांच्या गणवेशाचा आहे. राज्य स्तरावर सर्व शिक्षकांसाठी एकच गणवेश निश्चित केला जाणार नाही. त्याऐवजी प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन त्यांना कोणता गणवेश योग्य वाटतो याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शाळेला असणार आहे. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर (Students) येताना एकसमान असल्याचे जाणवले पाहिजे हा यामागचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्यापाठीमागे राज्य सरकारचे नेमके धोरण काय याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. याशिवाय शैक्षणिक वर्तुळातही त्याबाबत अद्याप विशेष भाष्य झालेले नाही. शिक्षकांना गणवेश लागू करण्याबाबत कोणी खास मागणी केल्याचे अद्याप तरी पुढे आलेले नाही. त्यामुळे शिक्षकांना अशा प्रकारची गणवेश सक्ती करुन राज्य सरकार नेमके काय साधू इच्छिते याबाबतही अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारचा नेमका विचार तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Crime News : सासरी छळ, मारहाण आणि पैशांसाठी त्रास; विवाहितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

0

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

बाभुळगाव (ता. राहुरी) येथे सासरी होणार्‍या मानसिक व शारीरिक छळामुळे त्रस्त झालेल्या 22 वर्षीय विवाहित महिलेने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिच्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती कैलास पाराजी पाटोळे, कमल पाराजी पाटोळे (दोघे रा. बाभुळगाव, ता. राहुरी), उत्तम महादु पाटोळे व शामल उत्तम पाटोळे (रा. कादंबरीनगर, पाईपलाईन रस्ता, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे पती कैलास पाटोळे, कमल पाटोळे, उत्तम पाटोळे व शामल पाटोळे यांनी तिला वेळोवेळी मारहाण केली. लग्नात मिळालेले सोन्याचे दोन ते तीन तोळे दागिने संशयित आरोपींनी तिच्याकडून घेतले होते. दागिने परत मागितल्यावर फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तसेच, पती कैलास पाटोळे याने तिच्या माहेरून 10 लाख रूपये गाडी खरेदीसाठी आणण्याची मागणी करत वारंवार मानसिक त्रास दिला.

या छळास कंटाळून तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात 17 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी बीएनएस कलम 85 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार दिवटे करत आहेत.

Nagar Urban Bank : ‘नगर अर्बन’च्या ठेवीदारांची उद्या नगरला बैठक; ठेवी व कायदेशीर कारवाईवर होणार चर्चा

0

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

नगर अर्बन बँकेत पाच लाखापुढे ठेवी असलेल्या ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यास होत असलेला विलंब तसेच नगर अर्बन बँक डबघाईस आणणारे संचालक मंडळ व थकबाकीदार कर्जदार यांच्यावर कायदेशीर कारवाईला असलेली संथ गतीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्या (रविवार, 20 एप्रिल) सकाळी साडे दहा वाजता अहिल्यानगर शहरातील महाजनगल्लीतील गायत्री मंदिर सभागृहात नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांची बैठक होणार आहे.

नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे सचिव डी. एम. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगर अर्बन बँकेत पाच लाखापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेल्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत कधी मिळणार, यांची आशा लागली आहे. तसेच बँकेला अडचणीत आणणार्‍या संशयित आरोपींना कठोर शासन होण्याच्यादृष्टीने प्रशासनाकडूनही गांभीर्याने हालचाली होत नसल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ठेवीदार व खातेदारांसह सभासदांची बैठक रविवारी सकाळी होणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

दरम्यान, यानंतर ठेवीदारांची कोणतीही बैठक घेतली जाणार नाही व व्हॉटसअ‍ॅपवर ठेवीदारांकडून दिल्या जाणार्‍या सूचनांचीही दखल घेतली जाणार नाही. त्यामुळे रविवारच्या बैठकीस ठेवीदारांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

संपादकीय : १९ एप्रिल २०२५ – आयुष्य संपवणे हा उपाय नव्हे

0

विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देणार्‍या मुलांच्या आत्महत्या हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालातदेखील तसे निरीक्षण नमूद आहे. मुलांवर त्यांच्या पालकांचे जीवापाड प्रेम असते. मुलांच्या प्रगतीची स्वप्ने जसे पालक बघतात तसेच मुलेही. त्यांच्या आयुष्याकडून त्यांच्या खूप अपेक्षा असतात. अपेक्षा असणे गैर नाही. तथापि त्या अपेक्षांनाच आयुष्य समजणे गैर आहे. तसे मानले जाते म्हणूनच अपेक्षापूर्ती न झाल्याने अनेक मुले त्यांचे आयुष्यदेखील संपवतात.

कोणतीही परीक्षा आयुष्यापेक्षा मोठी नसते. मुलांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे अपेक्षित आहे. मुले, त्यांचे पालक, मित्र आणि शिक्षक यांचा डोळस आणि सक्रिय सहभाग अपरिहार्य आहे. अपयशाने मुलांच्या मनात नकारात्मक विचार येणे स्वाभाविकच. पण ते ओळखायला मुलांनी शिकण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षा देणारी मुले जाणत्या वयाची असतात. तारतम्यचा विचार करू शकणारी असतात. उचलले जाणारे प्रत्येक पाऊल आणि त्याचे किमान वरवरचे तरी परिणाम त्यांना माहीत असतात. त्यामुळेच आत्महत्येने प्रश्न सुटत नाही, हेही कदाचित ते जाणून असतील.

विचारांची किमान लवचिकता त्यांनी दाखवणे अपेक्षित आहे. प्रत्येक प्रकारचा ताण हलका करण्याचा संवाद हा खूप सोपा आणि सरळ उपाय मानला जातो. मित्रांकडे-पालकांकडे मन मोकळे करणे, मनाची आंदोलने त्यांना सांगणे दबाव कमी करणारे ठरू शकेल. तसा विश्वास मुलांच्या मनात निर्माण करणे, त्याला पोषक वातावरण घरात असणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना मोठे करताना त्यांच्या मनात सकारात्मक-आशावादाची पेरणी करणे, काहीही झाले तरी मुलापेक्षा कोणीतही गोष्ट त्यांच्यासाठी मोठी किंवा महत्त्वाची नाही हे मुलांच्या मनावर कृतीतून ठसवणे, त्यांची कोणाशीही तुलना न करणे, मुलांना व्यायाम-प्राणायाम आणि ध्यान करण्याची सवय लावणे हे पालकांचे कर्तव्यच आहे.

छोटे छोटे छंद जोपासण्यासाठी मुलांना प्रेरणा दिली जायला हवी. एवढेच नाही तर मूल मनाने अस्वस्थ असेल तर समुपदेशकाची मदत घेण्याइतकी समजदारी किती पालक दाखवतात? त्यासाठी वेळ नाही ही सबब उपयोगाची नाही. दुर्दैवाने मुलाने वेडेवाकडे पाऊल उचलले तर वेळ कायमची निघून जाते हे पालक लक्षात घेतील का? परिस्थितीचा स्वीकार हे तिच्यावर मात करणारे पहिले पाऊल ठरते. आयुष्यात चढ-उतार होतच असतात. त्यांचा सामना करायला हवा. तेच खरे माणूसपण आहे. याची शिकवण मुलांमध्ये योग्य वयात रुजली तर वाढत्या वयात त्यालाच धुमारे फुटू शकतात. मुले हार न मानता संघर्ष करतात. यालाच मुलांचे संगोपन आणि संवर्धन मानले जाते. जे फक्त माणसेच करू शकतात. तात्पर्य, हे जीवन सुंदर आहे हेच खरे.

Dnyanradha Credit Society Fraud : ‘ज्ञानराधा’ मध्ये 1300 ठेवीदारांचे 77 कोटी अडकले; राहुरी, जामखेड, खर्डा शाखेचा ‘मनीट्रेल’ अहवाल पोलिसांच्या हाती

0

अहिल्यानगर । सचिन दसपुते

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या फसवणुक प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, जामखेड व खर्डा शाखेचा ‘मनीट्रेल’ अहवाल येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती आला आहे. त्यानुसार या तीन शाखेतील सुमारे 1300 ठेवीदारांचे 77 कोटी 76 लाख 74 हजार 681 रूपये अडकले असल्याचे समोर आले आहे. हा सर्व पैसा चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे याच्या 12 कंपन्यांच्या कर्जखात्यावर गेला असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

ज्ञानराधा मल्टिस्टेट फसवणुक प्रकरण राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणाचे बीडसह इतर जिल्ह्यात एकुण 98 गुन्हे दाखल आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील जामखेड व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. श्रीरामपूरच्या गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडीट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. तर जामखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे ‘मनीट्रेल’ करण्यात आले आहे. त्याचा अहवाल गुन्हे शाखेला प्राप्त झाला आहे.

या अहवालातून फसवणुकीचा आकडा 77 कोटींच्या घरात गेला आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चेअरमन सुरेश कुटे, व्हा. चेअरमन यशवंत वसंतराव कुलकर्णी, संचालक वैभव यशवंत कुलकर्णी, आशिश पद्माकर पाटोदेकर यांना बीड पोलिसांच्या ताब्यातून जामखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यांच्या कोठडीदरम्यान पोलिसांनी तपास केला आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

चेअरमन कुटे याने सुरूवातीला जामखेड व नंतर खर्डा, राहुरी येथे शाखा सुरू केल्या होत्या. या शाखेत ठेवीदारांनी पैशांची गुंतवणुक केली. मात्र सहा महिन्याच्या आत या शाखा बंद झाला. जामखेड येथील ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळासह 19 जणांविरूध्द 7 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. या दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुन्ह्याचे ‘मनीट्रेल’ ऑडीट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जामखेडसह खर्डा व राहुरी येथील शाखेच्या व्यवहाराचे ‘मनीट्रेल’ करण्यात आले. त्याचा अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यानुसार एकुण 1300 ठेवीदारांचे सुमारे 77 कोटी 76 लाख 74 हजार 681 रूपये ‘ज्ञानराधा’मध्ये अडकले असल्याचे समोर आले आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष शिंदे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

दरम्यान, या तिन्ही शाखेतील 870 ठेवीदारांनीच आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करून तक्रार दिली आहे. इतर ठेवीदार आलेले नाही. इतर ठेवीदारांनी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

84 लाभार्थी

या तीन शाखेतून जमा झालेले सुमारे 77 कोटी 76 लाख रूपये ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या बीड येथील मुख्य शाखेत वर्ग झाले. तेथून हा पैसा सुरेश कुटे याने स्थापन केलेल्या 12 कंपन्यांच्या कर्जखात्यात गेला. तेथून 84 लोकांच्या खात्यावर ‘आरटीजीएस’व्दारे वर्ग करण्यात आला असल्याचे ‘मनीट्रेल’ अहवालातून समोर आले आहे.

32 संशयित आरोपी

सुरूवातीला चेअरमन कुटेसह 19 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र राहुरी, जामखेड व खर्डा शाखेचे मॅनेजर, संचालक व ज्या लोकांना व्यवहाराचे अधिकार दिले अशांना या गुन्ह्यांत संशयित आरोपी करण्यात आले आहे. 13 जणांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे संशयित आरोपींची संख्या 32 झाली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

0

बोरगाव । वार्ताहर Borgaon

सुरगाणा तालुक्यातील मांधा येथे घराच्या पायाचे खोदकाम करताना अचानक बिबट्याने शेतकर्‍यावर हल्ला चढवत गंभीर जखमी केले. त्यांना तत्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मांधा येथील रहिवासी सीताराम मलू ठाकरे (44) हे शुक्रवारी सकाळी सहा ते साडेसहा वाजेदरम्यान आपल्या घराच्या पायाचे खोदकाम करत होते. अचानक पाठीमागून बिबट्याने येऊन त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्रथम पांगारणे येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत मोठ्या आवाजाने बिबट्याला जंगलाच्या दिशेने पळवून लावले आणि तातडीने मदतकार्य सुरू केले. नातेवाईकांच्या मदतीने शेतकर्‍याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटना समजताच उंबरठाण येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले की, ही घटना अतिशय गंभीर असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार आहे. घटनेनंतर मांधा गावात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या वतीने गावकर्‍यांना सतर्क राहण्याचे आणि अंधारात व एकट्याने शेतात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्लायवूड फॅक्टरीला आग; पंधरा तासांनंतरही आगेची धग कायम; दुसरे दुकानही पेटले

0

नाशिक। प्रतिनिधी Nashik

शहरातील तपोवन येथे लोकेश लॅमिनेटिस या प्लायवूडच्या फॅक्टरीला गुरुवारी रात्री(दि. १७) भीषण आग लागल्यानंतर पंधरा तास उलटूनही तिची धग रात्री उशिरापर्यंत कायम हाेती. त्यातच, शुक्रवारी याच भागातील इंद्रायणी लाॅन्सजवळील सुहान फर्निचर दुकानासही आगेने वेढा घातला. एकाच भागात दाेन ठिकाणी आगीच्या गंभीर घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त हाेत असून या आगीत लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. दाेन्ही ठिकाणांची आग शमविण्यासाठी २२ हून अधिक बंबांच्या साहाय्याने डझनभर फेऱ्या सुरु आहेत.

लाेेकेश लँमिनेट्स या कंपनीमध्ये अचानकपणे गुरुवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास आगीचा भडका उडाला. घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. आग विझवण्यासाठी या फॅक्टरीच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्यावरून जवानांनी पाण्याचा मारा सुरू करुन नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यांवर वाहतूक व वर्दळ नव्हती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी किमान वेळेत पोहोचता आले व आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास तातडीने सुरुवात झाली. मात्र लाकडामुळे आगीचे स्वरुप आक्राळविक्राळ असल्याने अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही, असे अग्निशमन विभागाने सांगितले आहे.

दरम्यान, नाशिक महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनमध्ये असलेल्या विहिरीच्या पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे आता तिथेही पाण्याचे टंँकर भरण्यासाठी अडथळे आले. ८ बंबानी प्रत्येकी २ फेऱ्या या विहिरीवरून केल्या. जीपीओ जलकुंभ इथून पाण्याचा भरणा बंबांमध्ये करण्यात आला. या ठिकाणीसुद्धा पाण्याचा पुरवठा कमी झाला असल्यामुळे पाण्याचे प्रेशर कमी आहे. त्यामुळे बंब भरण्यासाठी वेळ लागत असून एका पाठोपाठ चार ते पाच बंबांच्या इथे रांगा लागल्या आहे.

नाशिक अग्निशमन दलाचे १२ बंब तसेच पिंपळगाव बसवंत, अंबड एमआयडीसी, सिन्नर, मालेगाव येथील प्रत्येकी एक असे १६ बंब, आयएसपी सीआयएसएफचा एक असे १७ बंबानी प्रत्येकी पाच फेऱ्या मारून रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम केले. मात्र, शिंगाडा तलाव, पंचवटी व जीपीओतील पाणी कमी झाल्याने बंब व ब्राऊझर भरण्यास विलंब हाेत गेला. तरी अद्यापही दाेन्ही ठिकाणांच्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.

जुना वाडा कोसळला

0

नाशिक। प्रतिनिधी Nashik

पंचवटी परिसरातील जुना वाडा शुक्रवारी (दि.१८) मध्यरात्री कोसळला. वाड्याच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली वृद्धेसह एक व्यक्ती अडकला होता. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य राबवून दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पंचवटीतील पेरीना आईस्क्रीम समोरील वाडा कोसळला. याची माहिती नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षास कळवली. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेल्या वाड्याची पाहणी करत असताना वाड्यात दोन नागरिक अडकून पडल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जवानांनी बचाव कार्य राबवून वाड्यात शिरून मातीच्या ढिगाऱ्याखालून मंगला प्रकाश देवकर (६०) व त्यांचा भाचा सागर उत्तमराव सोनवणे (३७) या दोघांना सुखरूप बाहेर काढले.

नागरिकांच्या माहितीनुसार, वाडा जीर्ण झाल्याने तेथील रहिवाशांनी वाडा सोडला होता, तर काही जण वाड्यातच राहत होते. तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या बचावकार्यामुळे दोघांचा जीव वाचवण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरु असून धाेकेदायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समाेर आला आहे.