Friday, May 17, 2024
Homeअग्रलेखलोकांनी आपापली काळजी घ्यावी हे बरे...

लोकांनी आपापली काळजी घ्यावी हे बरे…

पुन्हा एकदा देशात करोनाची चर्चा सुरु झाली आहे. यावेळी नाही म्हंटले तरी त्या चर्चेला राजकीय अनुसंधान आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात साशंकता असणार यात शंका नाही. राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्या येतच राहातील. गेल्या ४-६ वर्षात प्रत्येक गोष्टीत लोकांना राजकारण दिसते आहे. लोकांचा अंदाज कधी बरोबर ठरतो तर कधी चुकतो. कोणत्याही मुद्यांवर राजकारण करण्याची खोड राजकारण्यांना जडली आहे. याच्याबरोबरीने करोनाची चर्चा सुरु झाली आणि समाजमाध्यमांवर स्वयंघोषित तज्ञांचाही पुन्हा एकदा उदय झाला. त्यांनी त्यांची मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. करोनाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि आलेल्या-न आलेल्या लाटांबाबतीत तज्ज्ञांमध्ये एकमत आढळले नव्हते. करोना प्रतिबंधासाठी पाळावी लागणारी त्रिसूत्री, उपचार, त्यांची दिशा, कोविड बरा झाल्यावर घ्यावी लागणारी काळजी, लॉन्ग कोविड आणि लसीकरण अशा अनेक बाबतीत तज्ज्ञांची वेगवेगळी मते होती. त्यामुळे कोविडचा सगळा काळ सामान्य माणसांनी गोंधळात घालवला होता. आत्ताही तसे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेव्हा यात न पडता आपल्या आरोग्याची निगा राखणे आणि काळजी घ्यायला लोकानी प्राधान्य द्यायला हवे. गेल्या दोन वर्षात माणसांच्या सवयी बदलल्या आहेत. आरोग्यदृष्ट्या चांगल्या सवयी लोकांनी अंगिकारल्या आहेत. त्याचे फायदेही त्यांनी अनुभवले आहेत. त्यामुळे देशात साथ नाही ना, असे म्हणून चालणार नाही. त्रिसूत्रीचे त्वरित पालन सुरु करायला हवे. तोंडाला मुसके बांधणे, सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे हि ती त्रिसूत्री. जिचे पालन करणे खरे तर इतके सोपे आहे की त्यासाठी बंधने यायची वाट लोकांनी का पाहायला हवी? या त्रिसुत्रीचे संस्कार लहानपणापासूनच केले जातात. काळाच्या ओघात माणसे ते विसरली होती कदाचित. पण त्याचे महत्व करोनाने लोकांना पटवून दिले आहे. ते विसरून कसे चालेल? दिवस वर्षाखेरचे आहेत. वर्षाच्या शेवटचा दिवस साजरा करण्याची प्रथा अलीकडच्या काळात रूढ झाली आहे. त्याला व्यावसायिक स्वरूपही आले आहे. हा दिवस साजरा करण्याची  तयारी संबंधित सर्व घटकांनी केलीच असेल. केवळ हाच दिवस नव्हे तर दैनंदिन जीवन सुरळीत सुरु ठेवणे ही प्रशासनाबरोबरच लोकांचीही जबाबदारी आहे याचे भान राखावे लागेल. करोनाबाबत प्रशासन पातळीवरची तयारी सुरु झाल्याचे वृत्त झळकले आहे. ते होतच राहील. तथापि लोकांनाही दक्षता बाळगावी लागेल. उपचार घेण्यापेक्षा प्रतिबंध बरा हेच खरे. त्याबरोबरीने प्रशासनाने योजलेल्या उपायांना साथ देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे याची खूणगाठ मारलेली बरी. राजकारणी म्हणतात म्हणून भीती मानण्याचे कारण नाही हे जितके खरे तितकी आरोग्याची जोखीम ओढवून घेणेही शहाणपणचे ठरेल का? तेव्हा सद्यस्थितीत लोकांनी त्यांच्या आरोग्याची किमान काळजी घ्यावी हे बरे.  लोक अनुभवाने शहाणे झाले आहेत. आरोग्यपूर्ण सवयीची उपयोगीता ते जाणून आहेत. तेव्हा आरोग्यदृष्ट्या जागरूक होणेच समाजाच्या हिताचे आहे याचे भान लोकही राखतील अशी आशा वाटते. 

- Advertisment -

ताज्या बातम्या