नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) तब्बल नऊ महिने राहिल्यानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आता लवकरच पृथ्वीवर पोहोचणार आहेत. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘NASA’ने दिलेल्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्स यांच्यासह इतर दोन क्रू-९ सदस्यांसह बुधवारी (दि.१८) पहाटे पृथ्वीवर उतरणार आहेत. स्पेसएक्स ड्रॅगन क्रू कॅप्सूल अंतराळयानाच्या यशस्वी लँडिगकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता यांना पत्र लिहित १.४ अब्ज भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा अंतराळ प्रवास फक्त ८ दिवसांसाठी होता. पण बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातील तांत्रिक अडचणींमुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा मुक्काम वाढला होता. त्यानंतर आता स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे परतीचा प्रवास करत आहेत आणि ते लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर भारतात येण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहून भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान मोदींनी सुनीता विल्यम्स यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “जरी तुम्ही हजारो मैल दूर असलात तरी, तुम्ही आमच्या हृदयाच्या जवळ आहात,” असे म्हटले आहे. हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नासाचे माजी अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांच्याकडून सुनीता यांच्यापर्यंत पोहचवले होते.
मोदींनी पत्रात म्हटले की, “मी तुम्हाला भारतीयांच्यावतीने शुभेच्छा देतो. आज मी प्रसिद्ध अंतराळवीर माईक मॅसिमो यांना एका कार्यक्रमात भेटलो. या संभाषणादरम्यान तुमचे नाव समोर आले आणि आम्ही तुमच्या कामाचा आम्हाला किती अभिमान आहे, यावर चर्चा केली. या चर्चेनंतर मी तुम्हाला पत्र लिहिण्यापासून रोखू शकलो नाही. तसेच मी जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा माजी राष्ट्राध्यक्ष बिडेन यांना त्यांच्या अमेरिका भेटी दरम्यान भेटलो, तेव्हा मी नेहमी तुमच्या आरोग्याबद्दल विचारले होते. भारतीयांना तुमच्या कामगिरीचा नेहमीच अभिमान वाटतो”, असे मोदींनी म्हटले आहे.
“तुमची प्रेरणादायी जिद्द आणि परिश्रम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. तुम्ही हजारो मैल दूर असलात तरी आमच्या हृदयाच्या खूप जवळ आहात. भारतातील लोक तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि मिशनच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत. तुम्ही पृथ्वीवर परतल्यावर आम्ही तुमचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहोत. यजमानपद भूषवणे ही भारतासाठी अभिमानाची बाब असेल. तुम्हाला सुरक्षित परतीसाठी शुभेच्छा”, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एक्सवर शेअर केलेल्या पत्रात नरेंद्र मोदी यांनी म्हटलेले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा