Saturday, July 27, 2024
Homeनाशिकनकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विलीन होणार - पंतप्रधान मोदींची घणाघाती...

नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विलीन होणार – पंतप्रधान मोदींची घणाघाती टीका

नाशिक | Nashik

देशासह राज्यात पहिल्या चार टप्प्यातील मतदान (Voting) पार पडले असून पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Lok Sabha) मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) आणि नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव (Pimpalgaon) येथे सभा पार पडली.

- Advertisement -

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सप्तशृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू श्री रामचंद्रांना नमन करतो. काल वाराणसीमध्ये मी बाबा विश्वनाथ, काळ भैरवाचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर आज त्र्यंबकेश्वरच्या आणि भगवान काळारामाच्या भूमीवर आहे. त्यामुळे मी सर्वांना प्रणाम करतो. लोकांची सेवा हेच माझ्या जीवनाचे लक्ष आहे. तुम्ही मागील १० वर्षांत माझे काम बघितले असेल त्यानंतर आजी मी तुमच्याकडे विकसित भारत बनविण्यासाठी आशीर्वाद मागायला आलो आहे, असे मोदींनी म्हटले.

हे देखील वाचा : महायुती लोकसभेच्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी थेट आकडाच सांगितला

पुढे बोलतांना मोदी म्हणाले की, ‘एनडीएला मोठा विजय मिळणार असून हे कॉंग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. इंडिया आघाडीतील मुख्य पक्ष असणारा कॉंग्रेस पक्ष यंदाच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभूत होत असून त्यांच्यासाठी विरोधी पक्ष बनणे देखील मुश्कील आहे. इंडिया आघाडीचे जे नेते आहेत त्यांनी संपूर्ण छोट्या पक्षांना सूचना केली आहे की निवडणूक संपल्यानंतर कॉंग्रेसमध्ये विलीन व्हायला पहिजे, त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर हे पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे मोदींनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये नकली शिवसेना आणि नकली राष्टवादी यांचे विलीन होणे निश्चित आहे. मात्र, यामध्ये ज्यावेळी नकली शिवसेना विलीन होईल त्यावेळी मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेब ठाकरेंची येईल. बाळासाहेब म्हणाले होते की, ज्यावेळी शिवसेना कॉंग्रेसची होईल त्यावेळी माझे शिवसेनेचे दुकान बंद करून टाकेल. मात्र, आता त्यांच्या याच स्वप्नांचा नकली शिवसेनेने चुराडा केला आहे. बाळासाहेबांचे स्वप्न होते की अयोध्येत राममंदिर व्हावे, जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवावे त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. पंरतु, याची सर्वात जास्त चीड ही नकली शिवसेनेला येत आहे. आम्ही दिलेले राममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नकली शिवसेनेसह कॉंग्रेसने नाकारले. मात्र, आता राममंदिर उभे राहिले तरी कॉंग्रेस राममंदिराबाबत वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत, त्याच कॉंग्रेसला उरावर घेऊन नकली शिवसेना नाचत आहे, असे मोदींनी म्हटले.

हे देखील वाचा : “ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी…”; पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

तसेच जी कॉंग्रेस सावरकर यांच्याविरोधात बोलते त्या कॉंग्रेससोबत नकली शिवसेना असून त्यांनी कॉंग्रेससमोर गुडघे टेकले आहेत. पहिल्या चार टप्प्यातील निवडणुकांमध्ये नकली शिवसेना चारी मुंड्या चीत झाली आहे. आज मोदी सरकार गरिबांना मोफत धान्य आणि पक्के घरे देत आहे. गरीब कुटुंबाना उज्ज्वला गॅस देत आहे. हे देताना आम्ही कधीही कोणाचा धर्म आणि जात पहिली नाही. माझ पूर्ण जीवन गरीब, शेतकरी आणि महिलांच्या विकासासाठी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध केला होता. पंरतु, आता कॉंग्रेसला एससी, एसटी आणि गरिबांचे आरक्षण घेऊन मुस्लिमांना द्यायचे आहे. मात्र जो पर्यंत मोदी वंचितांचा चौकीदार आहे तोपर्यंत त्यांचे आरक्षण कोणीही हटवू शकत नाही, असेही मोदी म्हणाले.

मोदींच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्याची घोषणाबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा सुरु असताना एका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. त्याने पंतप्रधान मोदींना कांद्यावर बोला असा प्रश्न विचारला. त्यानंतर मोदी कांद्याच्या प्रश्नावर बोलले. मात्र, या घोषणाबाजीमुळे काही वेळ मोदींचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घोषणाबाजी करणाऱ्या या शेतकऱ्यांला सभेतून बाहेर काढत ताब्यात घेतले.

६० हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली

शेतकऱ्याने कांद्याच्या प्रश्नावरून घोषणाबाजी केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भाष्य केले. ते म्हणाले की, आमच्या सरकारने पहिल्यांदा कांद्याचा अतिरिक्त साठा करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही गेल्या हंगामात ७ लाख मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केला आहे. त्यानंतर आता आमचे सरकारने पुन्हा ५ लाख मेट्रिक टन कांदा साठा करण्याच्या तयारीत आहे. आमच्या सरकारच्या काळात ३५ टक्क्यांनी कांदा निर्यात वाढली आहे. तर गेल्या दहा दिवसांत आम्ही ६० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

प्रतिक्रिया

देशातील उद्योजक, कलाकार, खेळाडू, राजकारणी यांना भेटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना भेटत नाही. कृषीप्रधान अशी ओळख असलेल्या देशात शेतकऱ्यांनाच आपले प्रश्न मांडण्यासाठी पंतप्रधान वेळ देत नाही. हे निश्चितच शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी आहे. कांद्यावरील निर्यात बंदी कोणत्याही अटी शर्ती शिवाय सुरू करावी आणि कांदा निर्यात बंदीपासून मागील नऊ महिन्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी पोटी दरातील फरक म्हणून सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. भारत दिघोळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

- Advertisment -

ताज्या बातम्या