मुंबई | Mumbai
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (गुरुवारी) दिल्लीतील काँग्रेस (Congress) कार्यालयात पत्रकार परिषद घेत थेट स्क्रीनवर पुरावे दाखवत भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात मतदार यादीत ४० लाख संशयास्पद मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात वाढले नाहीत तितके मतदार गेल्या ५ महिन्यात वाढले आहेत असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता राहुल गांधींच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत बोचरी टीका केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,”महाराष्ट्रात (Maharashtra) मतदानांची (Voting) चोरी झालेली नाही आणि देशात कुठेही मतदानांची चोरी झालेली नाही. मला वाटतंय राहुल गांधीच्या मेंदूची (Brain) चीप चोरीला गेली आहे. त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे, म्हणून ते नेहमी खोटे बोलत आहेत, ते जनतेचे जनमत चोरत आहेत”, अशी टीका त्यांनी गांधी यांच्यावर केली.
फडणवीस पुढे म्हणाले की, “मागच्या वेळी महाराष्ट्रात ७५ लाख मतदार (Voter) वाढल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. आता महाराष्ट्रात ०१ कोटी मतदार वाढल्याचे म्हणत आहेत. दरवेळी काहीतरी नवीन सांगून ते सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आता आपली जमीन संपली असल्याचे समजले आहे आणि पुढच्याही निवडणुकीत त्यांना निवडून येता येणार नाही. बिहारमध्येही निवडून येणार नाहीत. म्हणून हे कव्हर फायरिंग आहे,” असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.
हे देखील वाचा : Rahul Gandhi : राहुल गांधींनी थेट स्क्रीनवर दाखवले पुरावे; निवडणूक आयोगाने भाजपसोबत निवडणूक चोरल्याचा केला गंभीर आरोप
तसेच “माझा राहुल गांधींना एक प्रश्न आहे की, तुम्ही वारंवार मतदार यादीत गोंधळ आहे असे म्हणता. मग जर निवडणूक आयोगाने बिहारच्या (Bihar) यादीची व्यापक सुधारणा सुरु केली आहे तर त्याला विरोध का आहे? कित्येक वर्षी आम्ही व्यापक सुधारणेची मागणी करत आहोत. २०१२ साली तर मी याचिका केली आहे. मग सुधारणा होणार कशी? आपल्या कायद्यात काय आहे? निवडणूक आयोगाने पुनरावलोकन करणे हेच महत्त्वाचे आहे. त्यालाही विरोध करायचा आणि मतदार यादी खराब असल्याचंही म्हणायचे. एका प्रकारे भारताच्या आपल्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्था आहेत, त्यावरुन लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, लोकशाही प्रक्रियांवरुन लोकांचा विश्वास उडाला पाहिजे आणि अराजक झाले पाहिजे अशी त्यांची मानसिकता दिसत आहे. कारण त्यांना पुढे पक्षाचे भविष्य दिसत नाही”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.





