मुंबई | Mumbai
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांनी मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये एकत्रित पत्रकार परिषद घेत अधिकृतपणे युतीची घोषणा केली. यावेळी राज ठाकरेंनी “महाराष्ट्रात सध्या ज्याप्रमाणे लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय आहे, तशाच काही राजकीय टोळ्या उमेदवार पळवण्याचे काम करत आहेत,” असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला होता. त्यानंतर आता यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हे देखील वाचा : Thackeray Brothers Alliance : मनसे-शिवसेना युतीची राज ठाकरेंकडून घोषणा; दोन्ही बंधू नेमकं काय म्हणाले?
यावेळी शिंदे म्हणाले की, “काही युती या जनतेच्या आणि विकासाच्या दृष्टीने होतात. महायुती ही महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासासाठी आहे. मात्र ठाकरे बंधूंची युती ही केवळ सत्तेसाठी आहे. युती कुणाचीही कुणाशी झाली तरी महाराष्ट्रात महायुती भक्कमपणे उभी आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला (Mahayuti) जनतेचा कौल मिळाला आहे. त्यामुळे सत्तेसाठी झालेल्या युत्यांमुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही.ठाकरे बंधूंची झालेली युती ही स्वार्थासाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. परंतु, जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार”, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर CM फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले, “हा प्रीतीसंगम नव्हे तर…”
पुढे ते म्हणाले, “मुंबई महापालिकेकडे यांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघितलं.आता हीच कोंबडी कापून खायचे काम सुरू आहे. आम्ही विचारधारेला पुढे घेऊन जाणारे असून, मुंबईचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं, त्यांच्यामुळे मुंबईकर हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला. या मराठी माणसाला मुंबईत परत आणण्याचे काम आम्ही करणार असून, त्यांच्या पुनर्विकासाचं काम आम्ही करत आहोत. रमाबाई आंबेडकरनगरमधील १७ हजार घरांचं काम आम्ही मार्गी लावलं आहे. जेव्हा निवडणुका येतात त्यावेळी हे ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार’ असा बोर्ड लावतात. मुंबईकर सुज्ञ असून, त्यांना विकास पाहिजे. आम्ही घेतलेले निर्णय हे मुंबईकरांच्या हितासाठीचे आहेत. पुढच्या सहा महिन्यामध्ये मुंबई खड्डेमुक्त होईल. करोनाच्या काळात फक्त पैसे खाल्ले गेले. जे स्वतःच्या पोरांना सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार? असेही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Video : ठाकरे बंधूंकडून बाळासाहेबांना अभिवादन; राज आणि उद्धव ठाकरे कुटुंबीय स्मृतिस्थळावर उपस्थित




