मुंबई | Munbai
काही दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत (Mumbai Municipal Corporation Election) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यामुळे महापालिकेतील ठाकरेंची सत्ता संपुष्टात आली होती. तब्बल १७ वर्षांनंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीला निवडणुकीच्या निकालात मोठा धक्का बसला. यानंतर आता ठाकरे बंधूंमध्ये महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे (Ritu Tawade) विराजमान झाल्या आहेत. तर उपमहापौरपदी शिंदे सेनेच्या संजय घाडी यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर, आता स्थायी समिती आणि इतर समित्यांवरील सभापतींच्या निवडी होत आहेत. दुसरीकडे स्वीकृत नगरसेवकपदासांठीही हालचाली सुरू झाल्या असून, ठाकरे सेनेच्या कोट्यातून एक नगरसेवक मिळावे यासाठी मनसे आग्रही असल्याचे बोलले जाते.
मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) पक्षाच्या तीन निष्ठावंत नावांवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटसद्वारे टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये लिहिले की, “कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये.” असे देशपांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता देशपांडे यांनी थेट नाव जरी घेतले नसले तरी त्यांचा रोख उद्धव ठाकरे यांच्याकडेच असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, मुंबई महापालिकेत एकूण १० स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे. संख्याबळानुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ३ जागा मिळणार आहेत. निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केल्यामुळे आणि अनेक ठिकाणी उमेदवारांसाठी प्रचार केल्यामुळे, या ३ पैकी १ जागा मनसेला मिळावी, असा आग्रह मनसेने धरला. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी याबाबत प्रस्तावही दिला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांची नावे दिल्याचे समजते.





