अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मठपिंप्री (ता. नगर) शिवारातील एका शेतकर्याच्या शेतातील तीन लाख रूपये किंमतीचे डाळींब अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. सदरचा प्रकार 8 सप्टेंबर रोजी रात्री आठ ते 12 वाजेच्या दरम्यान घडला असून याप्रकरणी 15 सप्टेंबर रोजी रात्री नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पराग विनायक निसळ (वय 52 रा. सातभाई मळा, दिल्लीगेट) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची मठपिंप्री शिवारात गट नंबर 100 मध्ये शेती आहे. या शेतीमध्ये त्यांनी डाळींबाचा बाग केला आहे. चोरट्याने 8 सप्टेंबरच्या रात्री आठ ते 12 वाजेच्या दरम्यान संधी साधून तीन लाख रूपये किंमतीचे डाळींब तोडून चोरून नेले. हा प्रकार रात्री 12 वाजताच उघडकीस आला. दरम्यान, निसळ यांनी 15 सप्टेंबर रोजी रात्री नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार आर.व्ही. गांगर्डे करीत आहेत.