Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यापदव्युत्तर पदवीधारक एमपीएससीच्या परीक्षेला अपात्र?

पदव्युत्तर पदवीधारक एमपीएससीच्या परीक्षेला अपात्र?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) काही दिवसांपूर्वी काढलेल्या माहिती व जनसंपर्क विभागांच्या (Public Relations Departments) पदभरत्यांसाठी शैक्षणिक पात्रतेची नवी नियमावली पुढे आणली आहे. आयोगाच्या या नियमावलीनुसार पत्रकारितेमध्ये ( Journalism) पदवी किंवा पदविका अर्थात डिप्लोमा घेतलेले पात्र आहेत तर त्यापेक्षावरचे शिक्षण म्हणजे पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी (एम.ए.जनसंवाद) घेतलेले उमेदवार मात्र अपात्र ठरले आहेत…

- Advertisement -

राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये विविध पदांसाठी ४२ पदांच्या भरतीची (Recruitment) जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे काढण्यात आली होती. गट-अ वरीष्ठ, गट-अ कनिष्ठ आणि गट-ब अशा श्रेणीचे हे ४२ पद असून यासाठी सोमवार २३ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. विशेष म्हणजे उपरोक्त सर्व ४२ पदांसाठी सारखीच शैक्षणिक आणि अनुभवाची पात्रता ठेवण्यात आली होती.

शैक्षणिक पात्रतेमध्ये पत्रकारितेमध्ये पदवी किंवा पदविका ही अट ठेवण्यात आली आहे. अनेक विद्यापीठांमध्ये पत्रकारितेचे पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी असे कोर्सेस चालविले जात आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीमध्येवरील सर्व कोर्सेस एकमेकांना पर्याय म्हणून दर्शविण्यात येतात. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगानुसार पदवी आणि पदविका हिच शैक्षणिक पात्रता महत्वाची असून यापेक्षा मोठी शैक्षणिक पात्रता (Eligibility) आयोगाला मान्य नसल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या जाचक नियमावलीमुळे पत्रकारितेचे शिक्षण घेऊन अनेक प्रसारमाध्यम संस्थांमध्ये कार्य करून पात्रता मिळविलेले पत्रकार अपात्र ठरले आहेत. तक्रार आणि शंकांच्या निरसनासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर काही क्रमांक देण्यात आलेले आहेत. या क्रमांकांवर फोन करून माहिती दिली असता त्यावरून सचिवांच्या ई-मेलवर तक्रार नोंदविण्यास सांगितले जाते. मात्र त्या तक्रारीवर कुठलेही उत्तर मिळत नाही.

एकीकडे वर्ग १ आणि २ च्या पदांसाठी जाहिरात काढायची आणि त्यासाठी पदवी आणि पदविका अर्थात डिप्लोमा ग्राह्य धरायचा पण पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना अपात्र ठरवायचे. हा नवा शोध महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लावल्याने संपूर्ण पदभरतीच्या पारदर्शतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दरम्यान, ऑनलाईन अर्ज सादरीकरणात येणा-या अडचणी संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक यांना निवेदन दिले आहे. यासंदर्भात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल (Hemraj Bagul) यांनी विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नसल्याचे म्हटले असून यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

…तर पदव्याच परत घ्या : संतप्त विद्यार्थ्यांची मागणी

दोन वर्ष पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अभ्यास करायचा आणि पुढे जाऊन कळते की, या पदवीला अर्थच नाही तर मग अशा पदव्युत्तर पदव्या देणा-या विद्यापीठांच्या पदव्याच परत घ्या, अशी मागणी संतप्त विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे मागील दशकभरानंतर माहिती व जनसंपर्क विभागात मोठी पदभरती काढण्यात आली आहे. मात्र आयोगाच्या तर्कहिन तांत्रिक त्रुटीमुळे आज हजारो विद्यार्थी या पदभरतीपासून वंचित राहत आहेत. आयोगाने यासंदर्भात कार्यवाही करून पदभरतीतील त्रुटी दूर करून पुन्हा अर्ज स्वीकृती करावी. अन्यथा विद्यापीठांचे कुलपती मा. राज्यपालांकडे अशा अपात्र ठरविणा-या पदव्युत्तर पदव्या परत करू, अशी माहिती पदभरतीपासून वंचित विद्यार्थ्यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या