मुंबई | Mumbai
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या “हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सरनाईक यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, “आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो, पण आमच्या तोंडी कधी हिंदी, कधी इंग्रजी येते. त्यामुळे हिंदी आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे”, त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
प्रताप सरनाईक नेमके काय म्हणाले?
हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण असल्याचे वक्तव्य राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी केले. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या वापरावरून राजकीय वातावरण तापले होते. हिंदी तर आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते, कधी इंग्रजी येते. त्यामुळे हिंदी आता बोलीभाषा बनली आहे. ठाणे व मिरा भाईंदर हा माझा मतदारसंघ आहे. जनतेशी बोलताना शुध्द मराठीत बोलतो. जेंव्हा मिरा भाईंदरकडे जातो तेंव्हा आपोआप तोंडातून हिंदी बाहेर पडते. आजकाल आपण मराठी आमची मातृभाषा आहे, आमची माय आहे असे म्हणतो. पण हिंदी आपली लाडकी बहीण आहे. कारण लाडक्या बहिणींमुळे आम्ही आज २३७ च्याही पुढे गेलो आहोत. असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले.
त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय लावावा, हे बघावे लागेल-बावनकुळे
प्रताप सरनाईकांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. “त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय लावला, हे मला बघावे लागेल. मराठी ही आमची मायबोली आहे आणि आम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मराठीतच बोलतो. प्रताप सरनाईक हे स्वतः मराठी भाषिक आहेत, आणि त्यांच्या मतदारसंघात मराठीचा वापर करतात. मीरा-भाईंदरमध्ये हिंदी भाषिक नागरिकांची संख्या अधिक असल्याने, त्यांनी त्या ठिकाणी हिंदीत संवाद साधला असावा”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राऊतांची टीका
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला सन्मानाने जगता यावे म्हणून शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी लाडकी बहीण आते बहीण मावस बहीण असे प्रकार नव्हते. आणि हेच लोक म्हणतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहोत. त्यांचे नेते जे आहेत त्यांना विचाराव हा जो विचार आहे मराठी संदर्भातला हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केलाय. हे जे विचार मांडत आहेत हा भाजपचा आणि अमित शहा यांचा विचार आहे. शिंदे सेनेचे नेते अमित शहा आहेत हे मी वारंवार सांगतो आहोत, त्यामुळे अमित शहा यांना जे बोलायचे आहे ते ही लोकं बोलतात, अशी टीकादेखील त्यांनी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा