भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात काल बुधवारपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणातून विसर्गही वाढविण्यात आला आहे.
दरम्यान रात्री 9.30 वाजता भंडारदरातून 9886 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. निळवंडेतून 11000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत असून या म्हाळुंगी नदीचे पाणी येऊन मिळत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 11039 दलघफू क्षमतेचे हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. पण अजूनही पाऊस कमी अधिक होत असल्याने त्या प्रमाणात प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी विसर्ग बंद करण्यात आला होता.
पण पाऊस सुरू झाल्याने हा विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला. काल दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. भंडारदरात दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद 45 मिमी झाली आहे. पाणलोटात पाऊस सुरूच असल्याने सकाळी 11 वाजता 4393 क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला. त्यानंतरही पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी 6 वाजता तो 7738 क्युसेकपर्यंत नेण्यात आला.
रात्री आठ वाजता त्यात आणखी वाढ होऊन 8812 क्युसेकवर पोहचला. तर निळवंडेतून प्रवरा नदीत 10000 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. निळवंडेत सध्या 8081 दलघफू पाणी आहे. भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.