Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्यानदी संवर्धन योजनेतील प्रस्तावाचे सादरीकरण

नदी संवर्धन योजनेतील प्रस्तावाचे सादरीकरण

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

नाशिक महानगरपालिका ( NMC)हद्दीतील मलजल व्यवस्थापन (Sewage Management) सुरळीत व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. मनपा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने तयार केलेल्या सुमारे चारशे कोटी रुपयांच्या प्रस्तावाचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्य शासनाला सादरीकरण करण्यात आले असून चार मलनिसारण केंद्रांचे अत्याधुनिकीकरण(Modernization of sewage treatment plants) व नद्या, उपनद्यांची स्वच्छता होणार असल्याने गोदावरीच्या संवर्धनासाठी या योजनेचा लाभ शहरप्रदूषणमुक्त होण्यासाठी होणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे( MP Hemant Godse ) यांनी दिली.

- Advertisement -

शहरातील आठ रिव्हरगेज झोनमध्ये मलनिस्सारण केंद्राची स्थापित क्षमता 360 एमएलडी इतकी आहे. यापूर्वी उभारलेले मलनिस्सारण केंद्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेले असले तरी अलीकडे राज्य प्रदूषण महामंडळामार्फत प्रक्रियेनंतर सोडण्यात येणार्‍या मलजलाच्या निकषात कडक बदल करण्यात आल्याने शहरातील मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

केंद्राच्या नदी संवर्धन योजनेतून शहरातील मलनिस्सारण केंद्राच्या आधुनिकीकरण करणे शक्य होणार असल्याने या योजनेत नाशिक महानगरपालिकेचा समावेश व्हावा आणि मलनिस्सारण केंद्राच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राने निधी द्यावा, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खा. गोडसे सातत्याने प्रयत्नशील आहेत. यातूनच मनपाने तयार केलेला डीपीआर मागील वर्षी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता.

महानगरपालिकेने राज्य सरकारचा सादर केलेला प्रस्ताव पर्यटन विभागाच्या सेक्रेटरी मनीषा वर्मा यांनी पुढील कार्यवाहीसाठी जॉईन सेक्रेटरी सूर्यकांत निकम यांच्याकडे पाठवला होता. सदर प्रस्तावाची लवकरात लवकर छाननी करून मनपा प्रशासनाकडून सादरीकरण करून यावे, यासाठी खा. गोडसे यांनी वेळोवेळी मंत्रालय स्तरावर जाऊन सचिव मनीषा वर्मा आणि सहसचिव सूर्यकांत निकम यांच्याकडे पाठपुरावा केला. यानंतर निकम यांनी प्रस्तावाची पूर्ण छाननी करून नुकतेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सादरीकरण अभ्यासले.

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत मनपा आयुक्त रमेश पवार, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे शिवाजी चव्हाणके तर मंत्रालयातील सूर्यकांत निकम, अर्चना परशुरामे आदी सहभागी झाले होते. मनपाच्या सादरीकरणावर निकम यांनी समाधान व्यक्त केले.

बैठकीचे इतिवृत्तही तयार झाले आहे. प्रस्तावाविषयी किरकोळ पूर्तता करणे बाकी असून पूर्तता होताच सदर प्रस्ताव लगेचच मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या