पुणे । Pune
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट आणि शरद पवार गट) या निवडणुकीसाठी एकत्र येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
शुक्रवारी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांपुढे एक खळबळजनक प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकाच चिन्हावर, म्हणजेच ‘घड्याळ’ चिन्हावर उमेदवार उभे करावेत, असा हा प्रस्ताव आहे. हा निरोप शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवला जाणार असून, त्यावर त्यांचा काय प्रतिसाद येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांमध्ये जागावाटपावरून सध्या तरी कोणतीही अडचण नसल्याचे चित्र आहे. या संभाव्य युतीची अधिकृत घोषणा आज रात्री किंवा उद्यापर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, ‘घड्याळ’ हे चिन्ह शरद पवार गटाला मान्य होणार का, हा सर्वात मोठा पेच आहे. अजित पवारांनी या प्रस्तावावर आज संध्याकाळपर्यंत आपला निर्णय कळवावा, असे बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.
दुसरीकडे, पुण्यातील राजकीय समीकरणे केवळ राष्ट्रवादीपुरती मर्यादित राहिलेली नाहीत. भारतीय जनता पक्ष शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) सन्मानजनक जागा देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेचा शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातही युती संदर्भात समांतर चर्चा सुरू आहेत. शिवसेनेचे पुण्यातील एक बडे नेते यासंदर्भातील प्रस्ताव घेऊन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याचे समजते.
पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपला रोखणे आवश्यक असल्याचे मानून ही नवी राजकीय समीकरणे आकाराला येत आहेत. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटाची साथ मिळाली, तर पुण्याच्या राजकारणात मोठा फेरबदल पाहायला मिळू शकतो. सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष शरद पवार गटाकडून येणाऱ्या उत्तराकडे आणि या संभाव्य महायुतीच्या घोषणेकडे लागले आहे.
पुढील २४ तास पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार असून, कोणत्या गटाची कोणाशी युती होते आणि उमेदवार कोणत्या चिन्हावर लढतात, याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.





