Thursday, April 2, 2026
HomeनगरRahata : लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच रेल्वे मार्गाचे निर्णय व्हावेत - ना. विखे...

Rahata : लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच रेल्वे मार्गाचे निर्णय व्हावेत – ना. विखे पाटील

जनतेतील संभ्रम दूर करण्यासाठी बैठक बोलवावी

लोणी |वार्ताहर| Loni

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय करू नयेत. प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या बदलाबाबत झालेला संभ्रम दूर करण्यासाठी तातडीने बैठक बोलवावी, अशी विनंती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना केली आहे.

- Advertisement -

पुणे-नाशिक प्रस्तावित रेल्वे मार्गावरून अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच जनतेमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना सविस्तर पत्र लिहून प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक बोलविण्याची विनंती केली आहे. संसदेच्या अधिवेशनात पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या झालेल्या चर्चेदरम्यान प्रस्तावित मार्गात बदल करून रेल्वे मार्ग शिर्डीहून प्रस्तावित केल्याची बाब समोर आल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला. या प्रकल्पाच्या तयार करण्यात आलेल्या पहिल्या आराखड्यानुसार नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक या भागातून रेल्वे मार्ग निश्चित करण्यात आला होता. यासाठी जमीनीचे भूसंपादन करण्यात आले होते. मात्र, अचानक झालेला बदल सर्वांनाच आश्चर्यकारक असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

यापूर्वी तयार करण्यात आलेल्या रेल्वे प्रकल्पाच्या आराखड्यातील बदलाबाबत जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभेच्या सदस्यांशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. प्रकल्प मार्गातील बदल करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे गरजेचे होते. परंतु तशी कोणतीही चर्चा न झाल्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये आणि जनतेमध्ये रेल्वे मार्गाबाबत मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणाचा रोष लोकप्रतिनिधींना सहन करावा लागल्याचे गांभीर्य मंत्री विखे पाटील यांनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत पहिल्यापासून असलेली मागणी विचारात घेण्यासाठी आपण तातडीने सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी, तसेच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय नासिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत कोणतेही निर्णय करू नयेत, अशी विनंती ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्राद्वारे आश्विनी वैष्णव यांना केली आहे.

ताज्या बातम्या

केंद्र

Central Government: अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खत-रसायन उद्योगाला...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiगेल्या एक महिन्यापासून सुरू असलेले अमेरिका-इराण युद्ध अद्यापही पूर्णपणे थांबायचे नाव घेत नाही. मात्र, हे युद्ध थांबवण्यासाठी सध्या हालचाली...