मुंबई | Mumbai
पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांना शिवसेना ठाकरे गटाकडून आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षांकडून ऑफर देण्यात आली होती. मात्र पुरोगामी विचारधारेशी ठाम असणाऱ्या पक्षासोबत आपली पुढील राजकीय वाटचाल असेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज मुंबईतील टिळक भवनात जगताप यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील काँग्रेस भवनात प्रशांत जगताप यांनी पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार , काँग्रेस नेते नसीम खान, पुण्याचे काँग्रेस नेते मोहन जोशी उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर जगताप यांचा पक्षप्रवेशाचा पक्षाला फायदा होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. महायुतीविरोधात अगदी ताकदीने रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचा निर्धार प्रशांत जगताप यांनी पक्षप्रवेशावेळी बोलून दाखवला.
माझी लढाई भाजप विरोधी, संघ विरोधी, आंतकवाद निर्माण करण्याच्या विरोधात
काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर प्रशांत जगताप यांनी बोलताना म्हटलं की, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. काँग्रेस पक्षाचा १३५ वर्षांचा प्रवास आहे. अथांग सागर आहे. पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून इथे दाखल होत आहे. आधीच्या पक्षातील नेत्यांचे आभार मानतो. काही वादावादी करून मी बाहेर पडलो नाही. गांधी, नेहरू आणि शिव, शाहू, आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्यासाठी मी इथे प्रवेश केला आहे. माझी लढाई भाजप विरोधी, संघ विरोधी, आंतकवाद निर्माण करण्याच्या विरोधात आहे. गुन्हेगारीत पहिला नंबर पुण्याचा हे गृहमंत्री सांगतात. भ्रष्टाचारात महाराष्ट्र पहिला आणि पुणे पहिला आहे, भाजपच्या ताब्यात पुणे आहे. 26 वर्ष मी त्या पक्षात राहिलो आहे. अनेक चर्चा पक्षांतर्गत झाल्या, मी कधीही माध्यमांना सुद्धा काही सांगितले नाही. आता देखील मी तेच करेन. पक्षाबरोबर कायम राहून मी काम करेन.
राजकारण बंद करेन पण आता काँग्रेसमधून जाणार नाही
भाजपला कोणी टक्कर देऊ शकतो तो पक्ष काँग्रेस आहे. आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून त्या पक्षात तरुण वयात दाखल झालो. राजकारण बंद करेन पण आता काँग्रेसमधून जाणार नाही. कोणाबद्दल दूजाभाव नाही, कोणाशीही वैर नाही. 16 गुन्हे दाखल झाले, राष्ट्रवादीमध्ये सर्वाधिक आंदोलन मी केली. पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेशी एकरूप राहीन, काँग्रेस कोणताही निर्णय घेईल त्याच्याबरोबर असेन असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.




