मुंबई | Mumbai
राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे जोरदार वारे वाहात आहेत. नामनिर्देशन अर्ज दाखल करायला सुरुवात झाली असून त्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. तरीही युती-आघाडी-विकास आघाड्यांचा अजून अंतिम निर्णय होत नाही. असे असताना मुंबई ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आहे. पण बंडखोरीची भीती असल्यामुळे दोन्ही पक्षांनी अद्याप जागावाटप जाहीर केले नाहीये. त्यात भाजपा आणि शिंदेसेना हेदेखील महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या दोन्ही पक्षांमधील मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणूक २०२६ साठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी भाजप १४० आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना ८७ जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. या महापालिकेमध्ये महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून २२७ जागा लढवणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा आता कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
येत्या १५ जानेवारीला राज्यातील महापालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या बैठका सुरू आहेत. या दोन्ही पक्षात २०० जागांपर्यंत एकमत झाले असून अद्याप २७ जागांवर चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधू यांच्या युतीमुळे महायुतीसमोर आव्हान उभे राहिले आहे. त्यात कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा महापौर मुंबईत बसवायचा असा प्रयत्न भाजपा नेतृत्वाचा आहे. त्यामुळे महायुतीत काही नरमाईची भूमिका घेत शिंदेसेनेला जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्याशिवाय शिंदेसेनेवर उघडपणे टीका करू नका अशा सूचनाही भाजपा नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचा वेट अँड वॉच
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून अद्याप एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून वेट ॲंड वॉच धोरण अवलंबण्यात आल्याची चर्चा आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर, पनवेल, नाशिक मधील जागावाटपाचा पेच कायम आहे. उद्यापर्यंत या सर्व ठिकाणचे जागावाटप पूर्ण होईल, अशी माहिती मिळत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





