नवी दिल्ली | New Delhi
देशात पुन्हा एकदा पावसाचा (Rain) कहर बघायला मिळत असून, जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब, महाराष्ट्र यासह १५ राज्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. यातील पंजाबमध्ये पावसाने अक्षरक्ष: थैमान घातले असून, परिस्थिती गंभीर आहे.
पंजाबधील संपूर्ण २३ जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला असून,अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पाऊस, नद्यांचा पूर आणि धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंजाबमधील (Punjab) प्रत्येक गाव उद्ध्वस्त झाले आहे. या पुरामुळे आतापर्यंत पंजाबमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे २२ हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर हजारो कुटुंबे बेघर झाली आहेत
दरम्यान, पंजाबमध्ये ७४ हून अधिक मदत शिबिरे उभारण्यात आली असून, तिथे लोकांना तात्पुरता आश्रय दिला जात आहे. तसेच सैन्य, हवाई दल, नौदल, बीएसएफ आणि एनडीआरएफच्या पथके बोटी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
शेती क्षेत्राला पुराचा मोठा फटका
पंजाबच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती क्षेत्राला या पुराचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत सुमारे १. ४८ ते १.७२ लाख हेक्टरवरील पिकांचे या पुरामुळे नुकसान झाले आहे. यामध्ये भात, कापूस आणि ऊस यासारख्या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तर गुरुदासपूर या जिल्ह्यात ४० हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली असून, सुमारे ३०० हून अधिक गावे उद्ध्वस्त झाली आहेत.
पावसाचा इशारा कायम
पंजाबमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कायम असून, पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर आज आणि उद्या गुजरात प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात ८ सप्टेंबर पर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना भरपाई मिळणार
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील नुकसानाचे मूल्यांकन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. याशिवाय सुरक्षेच्या कारणास्तव शाळा आणि महाविद्यालये ७ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.




