पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
परिसरातील ग्रामस्थांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्या पुणतांबा-चांगदेवनगर रस्त्यावर जलशुद्धीकरण केंद्राजवळ गेल्या काही दिवसापासून पाणी वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली असून या रसत्यावरून ये-जा करणार्यांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
जलशुद्धीकरण केंद्राजवळ सातत्याने काही ना काही कारणामुळे पाण्याची गळती होत असते व तेथे सातत्याने पाणी साचलेले असते. हे पाणी नेहमीच रस्त्यावर येते. याकडे पुणतांबा ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष का नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी जलशुद्धीकरण केंद्रावर सातत्याने येत असतात. तसेच पुणतांबा-चांगदेवनगर या मार्गावरून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामविकास अधिकारीही कामानिमित जात असतात.
जागतिक बँकेच्या सहकार्याने जलस्वराज टप्पा दोन अंतर्गत सुरु असलेल्या पुणतांबा गावासाठीच्या पूरक पाणीपुरवठा कामाची पाहणी सुद्धा करत असतात. त्यांच्या लक्षात ही बाब कशी येत नाही याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून गळती होणार्या पाण्याचा तातडीने निचरा होण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी चांगदेवनगर परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.