राहाता |वार्ताहर| Rahata
पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने राहाता नगरपरिषदेने मारलेली गरुडझेप आता राज्याच्या नकाशावर ठळकपणे उमटली आहे. मुंबई येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते राहाता नगरपरिषदेला माझी वसुंधरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहाता शहराकडे वेधले गेले आहे.
शनिवारी मुंबईत पार पडलेल्या या विशेष सोहळ्यात राहाता शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ आणि मुख्याधिकारी वैभव लोंढे उपस्थित होते. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी राहाता पालिकेने राबवलेल्या नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट उपक्रमांचे यावेळी राज्यस्तरावर कौतुक करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपली भावना व्यक्त करताना नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की, हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नसून राहाता शहराच्या सांघिक कष्टाचे फळ आहे.
या यशाचे खरे मानकरी आमचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी वैभव लोंढे आणि अहोरात्र कष्ट घेणारा नगरपरिषदेचा सर्व कर्मचारी वृंद आहे. त्यांच्या नियोजनामुळेच आपण हे शिखर गाठू शकलो. गेल्या काही काळापासून राहाता नगरपरिषदेने वृक्षारोपण, अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन, जलसंधारणाचे प्रकल्प आणि सौर ऊर्जेचा प्रभावी वापर या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या पुरस्कारामुळे शहराच्या पर्यावरणपूरक विकासाला आता नवी उभारी मिळाली आहे. या गौरव सोहळ्याप्रसंगी नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. राहाता नगरपरिषदेने मिळवलेल्या या बहुमानाबद्दल संपूर्ण तालुक्यातून आणि जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





