अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदा उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच मे महिन्यांत नगर जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसात आतापर्यंत 7 जणांचे बळी गेले असून 11 नागरिक जखमी झाले आहेत. यासह 26 मोठी तर 27 लहान जनावरे मृत्यूमुखी पडले असून 241 घरांसोबत 20 जनावरांचे गोठे पडले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अहवालावरून ही माहिती समोर आली आहे.
यंदा मान्सून पूर्व पावसाने जिल्ह्याच्या दक्षिण भागाला सुरूवापासून झोडपून काढले. यात अहिल्यानगर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, नेवासे आणि जामखेड या तालुक्यासह राहुरीचा काही भाग, अकोले तालुक्याच्या काही भागाचा समावेश आहे. या पावसामुळे घरांसह शेतात उभे असणारे चारा पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. विज पडून अथवा अंगावर भिंत झाड पडून जिल्ह्यात आतापर्यंत 7 जणांचा बळी गेला आहे. यात नगर 2, अकोले 1, नेवासा 1, राहुरी 1 आणि कर्जतमधील दोघांचा सामावेश आहे.
यासह नगर 1, कर्जत 1, राहुरी 2 आणि श्रीगोंदा तालुक्यातील 7 असे 11 व्यक्ती जखमी झालेले आहेत. यासह वादळी पावसामुळे जिल्ह्यात 26 मोठी आणि लहान 27 जनावरे पावसात मृत्यूमुखी पडली आहेत. यात नगर 20 लहान जनावरे, अकोले 3 मोठे आणि 1 लहान, जामखेड 4 मोठे, कोपरगाव 3 लहान, नेवासा 1 लहान, पाथर्डी 2 मोठी व 4 लहान, पारनेर 1 लहान, संगमनेर 4, शेवगाव 1 मोठे, श्रीगोंदा 6 मोठे यांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक घरांची पडझड संगमनेर 44, नेवाशात 41, कर्जत 29, राहुरी 20, पाथर्डी 19, श्रीगोंदा, अकोले आणि पारनेर प्रत्येकी 16, जामखेड 13, कोपरगाव आणि श्रीरामपूर प्रत्येकी 6, राहाता आणि नगर प्रत्येकी 3 यांचा समावेश आहे.
शेती पिकांचे पंचनामे सुरू
जिल्ह्यात मे महिन्यांत भाग बदलत जोरदार पाऊस झाला असून यामुळे उन्हाळी हंगामातील कांदा, चारा पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी उघडीप देत पुन्हा पुन्हा जोरदार पाऊस झालेला असून यामुळे शेती पिकांच्या नुकसानाची माहिती संकलन सुरू असल्याचे सांगण्यात आले.