राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
अधून मधून येणार्या पावसाने आणि घाट माथ्यावरील धबधब्याचे वाहत येणार्या पाण्यामुळे दारणा, भावली धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच आहे. काल दारणा 63.81 टक्क्यावर, भावली 94 टक्क्यांवर तर गंगापूर 73.04 टक्क्यांवर पोहचले. काल दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासात इगतपुरी येथे 60 मिमी, घोटी येथे 37 मिमी, भावलीला 40 मिमी, भामला 30 मिमी, त्र्यंबकला 18 मिमी, आंबोलीला 13 मिमी, गंगापूरला 14 मिमी पावसाची नोंद झाली. अन्य ठिकाणीही दोन अंकी पाऊस पडला आहे.
दरम्यान दारणा तसेच भावली धरणाच्या पाणलोटात मध्यम स्वरूपाच्या पावसाचे होत असलेले आगमन आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरुन फेसळत पडणारे धबधबे यामुळे नवीन पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासात दारणा धरणात 282 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. आतापर्यंत या धरणात 4 टीएमसी हून अधिक पाणी दारणाच्या साठ्यात सामावले आहे. 7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 4562 दलघफू साठा आहे. हे पाणी साडेचार टीएमसी हून अधिक आहे. हे धरण 63.81 टक्के भरले आहे. भावलीत 12 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 1434 दलघफू क्षमतेच्या या प्रकल्पात 1348 दलघफू म्हणजेच सव्वा टीएमसी हून अधिक पाणी आहे. भाम मध्ये 69 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 1 जून पासून या प्रकल्पात 1385 दलघफू नवीन पाणी दाखल झाले आहे. भाम प्रकल्पात 56.74 टक्के पाणीसाठा आहे.
गंगापूर धरणात 29 दलघफू नवीन पाणी 24 तासात दाखल झाले. 5630 दलघफू क्षमतेच्या गंगापूर मध्ये 73.04 टक्के पाणी साठा आहे. अन्य धरणाचा साठा असा – मुकणे 33.65 टक्के, वाकी 23.96 टक्के, वालदेवी 73.52 टक्के, कश्यपी 49.68 टक्के, गौतमी गोदावरी 83.94 टक्के, कडवा 76.13 टक्के, आळंदी 31.37 टक्के असे पाणी साठे काल पर्यंतचे आहेत.




