मुंबई | Mumbai
मुंबईसह (Mumbai) पश्चिम उपनगरांत पहाटेपासूनच मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, दहिसर, सांताक्रुझ, वांद्रे यांसह पश्चिम उपनगरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. .
काल रात्रभर अनेक ठिकाणी ६० ते १००मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत कोसळणाऱ्या या पावसामुळे मुंबईतील १५ दिवसांची पावसाची (Rain) कसर पूर्ण झाली आहे. मुंबईतील हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल या ठिकाणी पाणी साचले आहे. तर मुंबई उपनगरात अंधेरी, विरार, वसई या भागात अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा पाच ते दहा मिनिटं उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा (Passengers) खोळंबा झाला आहे.
दरम्यान, पुढील तीन ते चार तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये (District) काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईत भर दिवसा अंधाराचे वातावरण पाहायला मिळत असून, आज दिवसभर असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस
नांदेड जिल्ह्यात (Nanded District) ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून, या पावसाने अनेक भागांना जोरदार तडाखा दिला आहे. मुखेड तालुक्यात पाच ते सहा गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर हसणाळा गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातल्यामुळे अनेक नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली असून, सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
बावनदीने पात्र ओलांडले, वांद्री उक्षी परिसरात पूरस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. विशेषतः बाव नदीने आपले पात्र ओलांडल्यामुळे वांद्री उक्षी परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच परिसरातील अनेकांचा संपर्क तुटला आहे. बाव नदीच्या या पुरामुळे अनेक महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले असून, पावसामुळे नद्या-नाल्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. बाव नदीचे पाणी शेतीमध्ये आणि सखल भागात शिरले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम
विदर्भामधील अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढला आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा ५२ टक्क्यांवरुन ५८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असल्याचे बोलले जात आहे.




