मुंबई | Mumbai
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील आपल्या भाषणातून उद्योगपती गौतम अदानींवर टीका केली होती. त्यानंतर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना काँग्रेस शासित राज्यांनी देखील अदानींची गुंतवणूक घेतली आहे असे सांगत २०१४ नंतर देशाचा मोठा आर्थिक विकास झाला आहे असे भाष्य केले होते. त्यावर आता राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून फडणवीसांना लक्ष केले आहे.
गौतम अदानी यांनी स्वत:हून देशातील कुठलेही विमानतळ उभे केलेले नाही. ज्या व्यवसायामध्ये गौतमी अदानी कधीही नव्हते, त्या सिमेंटच्या व्यवसायात २ नंबरला अदानी गेले आहेत. दुसऱ्याचे व्यवसाय खेचून हे वर गेलेले आहेत, हा विषय कोणाच्या ग्रोथचा नाही. मात्र, ही वाढ कशी होतेय हे प्रत्येक नागरिकाने समजून घेणे गरजेचे आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी गौतम अदानींच्या विकासामागे मोदी सरकारचा मोठा हात असल्याचे म्हटले.
पहिल्या क्रमांकावर बिर्ला आहेत. त्यानंतर अदानीच आहेत. त्यांनी अल्ट्राटेक आणि अंबुजा अन् अजून काही कंपन्या विकत घेऊन हा व्यक्ती दोन नंबरला पोहचला आहे. गेल्या १० वर्षात हा व्यक्ती शुन्यातून थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. दुसऱ्यांचे व्यवसाय खेचून घेऊन तो दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. पॉवर, स्टील असे अनेक उद्योग तसेच आहेत.’
“विषय एवढाच आहे की टाटा, अंबानी, हिंदुजा असतील किंवा आणखी काही उद्योगसमूह असतील. या उद्योगसमुहांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी समजा ५० ते ६० वर्ष लागली असतील. मात्र, यांच्याही पलिकडे एक व्यक्ती जातो आणि तो फक्त १० वर्षांतच मोठा होतो? माझे म्हणणे ते आहे. सिमेंटपासून, स्टिल, पोर्ट, विमानतळे, वीज या सगळ्या गोष्टींची मोनोपॉली जर एका व्यक्तीकडे येत असेल तेव्हा एखादा माणूस या देशाला वेठीस धरू शकतो आणि त्याला सगळ्या गोष्टी पुरवणारे हे केंद्र सरकार आहे. त्या व्यक्तीला केंद्र सरकार रेड कार्पेट टाकते?”, असे म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली.
ते पुढे म्हणाले, ‘हा धोका मुख्यमंत्र्यांनी समजून घेण्याची गरज आहे. त्यांना समजनं गरजेचं आहे. त्यांना समजलं असेलही मात्र सांगतील तर कोणाला? बरं हे उद्योग उभे करत असताना अदानी यांना अर्थसहाय्य कोणी केलं. कोणकोणत्या बँकांनी कर्ज दिलं. कोणत्या इतर संस्थांना अर्थसहाय्य करायला लावलं. उद्या जर गोष्टी कोसळल्या तर नोकऱ्या तर जातीलच देश बरबाद होईल. हा देश एकदिवस ठप्प होईल.
फडणवीस काय म्हणाले होते?
राज ठाकरे सांगतात की, 2014 नंतर पंतप्रधान मोदी यांच्यामुळे अदानींची नेटवर्थ वाढली. मी काही अदानींचा वकील नाही. पण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, 2014 साली भारत हा जगातील 11व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. आता 2026 साल उजाडेपर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. साहजिकच अर्थव्यवस्था वाढल्यानंतर देशभरात अनेक नवे उद्योजक तयार झाले. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ज्या कंपन्या यापूर्वी भांडवली बाजारात सूचिबद्ध (लिस्टेड) होऊ शकल्या नव्हत्या, त्या सूचिबद्ध झाल्या. देशातील प्रस्थापित उद्योगसमूहांनी प्रचंड विस्तार केला. या प्रत्येकाचे उत्पन्न आणि नफा प्रचंड वाढला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
2014 नंतर टाटा समूहाचे उत्पन्न 664, एचडीएफसी बँकेचे उत्पन्न 377 टक्के, अदानी समूह 686 टक्के, इन्फोसिस 280 टक्के, आदित्य बिर्ला ग्रूप 566 टक्के, भाती ग्रूप 266 टक्के, सन फार्मा 1552 टक्के, हिंदूजा ग्रूप 376 टक्के आणि एव्हेन्यू समूहाचे उत्पन्न 1166 टक्क्यांनी वाढले. सन फार्मा आणि एव्हेन्यू समूह या दोन्ही कंपन्या मुंबईच्या आहेत, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.




