नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मनपा निवडणुकीसाठी (NMC Election) प्रचाराचा मंगळवारी (दि.१३) अखेरचा दिवस असून, सायंकाळी प्रचार थांबणार आहे. तर गुरुवारी शहरातील १,५३८ केंद्रांवर मतदान (Voting) प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, काही केंद्रे संवेदनशील तर काही अतिसंवेदनशील आहेत. त्याचप्रमाणे प्रशासनाने काही ठिकाणी महिलांसाठी पिंक मतदान केंद्रे तयार केली आहे. दरम्यान, शहरातील सर्व ३१ प्रभागांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारांनी सकाळपासूनच प्रचार रॅल्या, घराघरांत भेटी, चौकसभा आणि वाहन फेऱ्यांचे आयोजन करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
हे देखील वाचा : Nashik MC Election : नाशकात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले; ‘आप’च्या उमेदवारावर ताणली बंदूक!
प्रशासनाने मतदान व मतमोजणीसाठीची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. १३ लाख ६० हजार मतदारांसाठी शहरात एकूण १,५६८ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या व्यवस्थापनासाठी १० निवडणूक व्यवस्थापन, मतदार ओळख निर्णय अधिकारी, ३० सहायक निवडणूक (Election) निर्णय अधिकारी आणि सुमारे १० हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर ईव्हीएम तपासणी, सुरक्षाव्यवस्था तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन दल आणि आरोग्य विभागालाही अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे, जेणेकरून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये.
हे देखील वाचा : Nashik News : चौक सभेदरम्यान मंत्री महाजनांशी बाचाबाची
दरम्यान, प्रभागानुसार मतदान केंद्रांची (Voting Centre) संख्या ठरवताना लोकसंख्या, मतदार संख्या व भौगोलिक रचना विचारात घेतली आहे. यामध्ये प्रभाग क्र. २५ मध्ये सर्वाधिक ६६ मतदान केंद्रे असून हा प्रभाग शहरातील सर्वात मोठा असून प्रभाग १४ मध्ये ६५ आणि प्रभाग ३० मध्ये ६२ मतदान केंद्रे आहेत. नवीन नाशिक परिसरातील प्रभाग क्र. २७, २९ आणि ३१ साठी एकूण १४६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील मतदान केंद्रांसाठीआवश्यक साहित्याचे वितरण १४ जानेवारी रोजी सकाळी राजे छत्रपती संभाजी स्टेडियम येथील स्ट्रॉग रूममधून करण्यात येणार आहे. दुपारपर्यंत सर्व मतदान केंद्र सज्ज होतील. मतदानानंतर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून, सकाळी ९ वाजता स्ट्रॉगरूम उघडल्या जातील. त्यानंतर पोस्टल मतमोजणी व ईव्हीएम मतमोजणीच्या एकूण ११ फेऱ्या होणार असून, दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणूक निकालाचे कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.





