मुंबई
रिझर्व्ह बँकेकडून नव्या वित्तीय वर्षातील पहिले पतधोरण आज (बुधवार) जाहीर करण्यात आले. करोना संकट आणि वाढता महागाई दर यापार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून पतधोरणात कोणताही बदल केले जाणार नाही, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला. तीन दिवसांच्या आढावा बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदरात काहीच बदल केला नाही.त्यामुळे कर्जदारांवरील ईएमआयचा भार वाढला नसला, तरी दिलासाही मिळालेला नाही.
कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन धोरणात्मक व्याजदर कायम ठेवले जाऊ शकतात, असे एका सर्वेक्षणात नमूद करण्यात आले होते. दरम्यान, २०२२ च्या पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याज दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. याशिवाय रेपो दरही ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे रिव्हर्स रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून तेदेखील ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले होते.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातदेखील व्याज दरात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याची घोषणा शक्तिकांत दास यांनी केली होती. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या सावटादरम्यान रिझर्व्ह बँक व्याजदरात कोणतेही बदल करणार नाही अशी शक्यता काही जाणकारांनी व्यक्त केली होती.