श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील काष्टी येथील मुख्य शाखा असलेल्या साईसेवा ग्रामीण पतसंस्था आणि साईसेवा मल्टिस्टेटमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याने मागील सहा महिन्यांपासून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. शनिवारी (दि.31) ठेवीदारांनी मुख्य कार्यालयासमोर ठेवी परत मिळवण्यासाठी ठिय्या आंदोलन केले.
तालुक्यात आत्तापर्यंत सहकारी संस्था क्षेत्रात असे मोठे घोटाळे झाल्याचे उदाहरण नाही. मात्र मागील सहा महिन्यांपासून काष्टी येथील नामांकित पतसंस्था आणि मल्टिस्टेटच्या मुख्य व उपशाखांमध्ये ठेवीदारांचे पैसे मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत. पतसंस्था आणि मल्टिस्टेटचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी ठेवी परत देण्याचे आश्वासन देत असले तरी ते पूर्ण होत नाही. त्यामुळे ठेवीदार आता आंदोलनाच्या मार्गावर आले आहेत. काष्टी, श्रीगोंदा शहर, बेलवंडी, मढे वडगाव आणि हंगेवाडी येथे शाखा सुरू झाल्या. ठेवीदारांनी विश्वासाने पैसा गुंतवला, मात्र त्याचा गैरवापर सुरू झाला.
मुख्य शाखेतील पैसे उपशाखांकडून घेऊन जमीन, मालमत्ता, आलिशान गाड्या आणि खाजगी व्यवसायांमध्ये वापरण्यात आले. काही पैसे नातेवाईक, कर्मचारी किंवा जवळच्या व्यक्तींच्या नावावर कर्ज दाखवून हलवले गेले. मागील एक-दोन वर्षांत सिस्पे आणि इतर परताव्याच्या अपेक्षांमुळे सहकारी संस्थांमधील ठेवी कमी होत असताना, या पतसंस्थेत ठेवीदारांचा विश्वासघात करत पैसे इतर कारणांसाठी वापरण्यात आले. ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर पैसे मागितले असता केवळ आश्वासन मिळत होते. शनिवारी झालेल्या ठिय्या आंदोलनात ठेवीदारांनी ठामपणे सांगितले की, आता कायदेशीर लढा उभारला जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत आपले पैसे परत मिळवले जाणार आहेत.




