
मुंबई । Mumbai
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांच्या नावाखाली सध्या प्रचंड भ्रष्टाचार उफाळून आला असून, तब्बल २५ हजार कोटी रुपयांची उधळपट्टी आणि लूट सुरू असल्याचा सनसनाटी आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (२९ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत केला. “नाशिकमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यावर नाशिककरांनी पूर्णपणे बहिष्कार टाकला होता,” असा दावा करत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जोरदार टीकास्त्र सोडले.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “कुंभमेळ्याच्या भ्रष्टाचारावर केवळ विरोधकच नाही, तर साधू-संतही आता उघडपणे बोलू लागले आहेत. या कुंभमेळ्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ४५ हजार कोटी रुपयांच्या बजेटपैकी किमान २५ हजार कोटी रुपये कुंभमेळा मंत्री आणि त्यांचे अधिकारी मिळून उडवणार आहेत, याची सुरुवात आतापासूनच झाली आहे.”
शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांवरून सरकारवर ताशेरे ओढताना ते पुढे म्हणाले, “नागपूरच्या रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे जाणारे बळी सरकारला दिसत नाहीत का? सध्याच्या सरकारची अवस्था महात्मा गांधींच्या तीन माकडांसारखी झाली आहे. फरक एवढाच की गांधीजींची माकडे नीतिमत्तेची होती, तर या सरकारची माकडे वेगळी आहेत—त्यांना भ्रष्टाचार दिसत नाही, ते भ्रष्टाचारावर बोलत नाहीत आणि तो पाहतही नाहीत.”
मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक हल्ला चढवताना राऊत म्हणाले, “ज्या मुख्यमंत्र्यांना अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरीवर बोलता येत नाही, त्यांना कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. १० वर्षांपूर्वी नाशिक दत्तक घेण्याची भाषा करणाऱ्यांनीच या शहराची पुरती दुर्दशा केली आहे. शहरात कामांचे कसलेही नियोजन नसून केवळ टेंडर काढून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम सुरू आहे.” यावरून फडणवीसांना खोटे बोलण्याची खास डिग्रीच द्यावी लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.




