Monday, August 10, 2026
Homeराजकीयआमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते...' संजय राऊतांचा भाजपला थेट...

आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते…’ संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा

मुंबई । Mumbai

शिवसेनेचे पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाच्या ताब्यात राहणार, यासंदर्भातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना पक्षातील फूट, नेत्यांचे पक्षांतर, शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधान मोदींसोबतची नियोजित भेट आणि जयंत पाटील यांच्या देवेंद्र फडणवीसांसोबतच्या विमानप्रवासावर भाष्य केले.

- Advertisement -

इतर पक्षांचे खासदार पंतप्रधानांची भेट घेत असताना शिवसेना उबाठाचे खासदार त्यांची भेट का घेत नाहीत, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “आम्ही पंतप्रधान मोदींना भेटायला जाणार नाही, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे,” असे राऊत म्हणाले.

शिवसेनेत झालेल्या फुटीवरूनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेत फूट पाडून पक्ष दुसऱ्यांच्या हातात देण्यात आला. आगामी काळात सत्ता परिवर्तन झाल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. सत्ता गेल्यानंतर भाजपची स्थिती मोठ्या प्रमाणात बदलू शकते, असा दावा राऊत यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमानप्रवास केल्याच्या मुद्द्यावरही राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हा प्रवास म्हणजे राजकीय जवळीक असल्याचे थेट गृहित धरता येणार नाही, असे सांगितले. “एकाच विमानातून प्रवास केला म्हणून काय झाले?” असा सवाल करत त्यांनी राजकीय नेत्यांच्या प्रवासावरून निष्कर्ष काढण्यास हरकत घेतली.

शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत होणारी भेटही चर्चेत आहे. यावर राऊत म्हणाले की, खासदारांना आपल्या मतदारसंघातील तसेच संसदीय प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घ्यावी लागू शकते. ही भेट लपूनछपून होत नसून नियोजित पद्धतीने होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिसीमनाच्या मुद्द्यावरही राऊत यांनी भूमिका मांडली. सुप्रिया सुळे यांच्याशी आपले बोलणे झाल्याचा दावा करत त्यांनी इंडिया आघाडीच्या विरोधात शरद पवार गट भूमिका घेणार नसल्याचे सांगितले. तसेच एनडीएला मदत करण्याची भूमिका घेतली जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी, बदलती राजकीय समीकरणे आणि विविध पक्षांतील नेत्यांच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेला पुन्हा वेग आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : पाेलिसांनी काढली टवाळखोरांची हवा! सोशल मीडियावर ‘भाईगिरी’ची नशा...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik गल्लीबोळात चार-पाच काडीमोडी पोरांना एकत्र करून, इन्स्टाग्रामवर रील्स टाकून स्वतःला हिराे समजणाऱ्या टवाळखोरांना नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) दणका...